उस्मानाबाद :- मतदान हा पवित्र अधिकार असून त्याच्या माध्यमातून चारित्र्यसंपन्न उमेदवारांची निवड मतदारांनी करावी. मतदान हा प्रत्येकाचा हक्क आहे. तो त्यांनी निर्भयपणे बजावला पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे यांनी केले.
      राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास, अपर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) बी. एस. चाकूरकर, तहसीलदार सुभाष काकडे, मतदार जनजागरण समितीचे अध्यक्ष एम.डी. देशमुख, सदस्य अब्दुल लतीफ, जि. प.कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस. पाटील, नायब तहसीलदार राजेश जाधव, वाघमारे, श्री. देशपांडे यांच्यासह इतर मान्यवर विविध शाळांचे प्रतिनिधी, विद्यार्थी उपस्थित होते.
       यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे आणि मान्यवरांच्या हस्ते नवमतदारांना मतदान ओळखपत्राचे वितरण करण्यात आले.  यांत शुभांगी कोरे, अनुप्रीती नायगावकर, संकेत कुलकर्णी, प्रज्ञा भोसले, संतोष पेठे, सादिक शेख, इसहाक शेख, नयुम पठाण, सुदर्शन साळुंके आदींना या ओळखपत्राचे वितरण करण्यात आले.
         मतदार नोंदणी वाढावी, 18 वर्षापुढील सर्व युवक-युवतींनी मतदार नोंदणी करावी, मतदानाचा हक्क बजावावा, लोकशाही परंपरेचे पालन करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या लोभास बळी न पडता, आणि जात, धर्म, वंश, समाज,  भाषा अशा प्रभावाखाली न येता निर्भयपणे आपला हक्क मतदारांनी पार पाडावा, अशा प्रकारची प्रतिज्ञा यावेळी डॉ. नागरगोजे यांनी उपस्थितांना दिली.
        समाजातील प्रत्येक घटकांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. प्रसारमाध्यमांनीही मतदारांमध्ये मतदानाविषयीची जागरुकता वाढवावी, असे प्रतिपादन त्यांनी केले.
      हरिदास यांनी मतदान हा सर्वात मोठा हक्क असून लोकशाही व्यवस्था बळकट करणारा हक्क सर्वांनी बजावला पाहिजे, असे सांगितले. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
        मतदार नोंदणी अधिकारी सूर्यवंशी यांनी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यामागील भूमिका समजावून सांगितली.
        जिल्ह्यात 45 हजार 792 नवीन मतदारांची नोंद झाली आहे. आज जिल्ह्यात विविध ठिकाणी हा दिवस साजरा करण्यात येऊन नवमतदारांना ओळखपत्र प्रदान करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
        मतदार जनजागरण समितीचे अध्यक्ष  देशमुख यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्न होण्याची गरज व्यक्त केली. या मोहिमेत सामाजिक संघटनांनीही पुढे आले पाहिजे, असे ते म्हणाले. सर्व सुशिक्षित नागरिकांनी मतदान केलेच पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था असली पाहिजे, असे ते म्हणाले.
        लतीफ यांनी शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली. शुभांगी कोरे या विद्यार्थिनीनेही आपण मतदानाचा हक्क आवर्जून बजावणार असून चांगले लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी अधिकाराचा वापर करणार असल्याचे सांगितले,
       कार्यक्रमाचे सूत्रसंचलन काकडे यांनी केले तर चाकूरकर यांनी आभार मानले.
       दरम्यान मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषद कन्या प्रशाला ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी जागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने विद्यार्थी- विद्यार्थिनी सहभागी झाले होते. तहसीलदार श्री. काकडे यांनी मान्यवरांसह त्याचा शुभारंभ केला.
 
Top