बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- उपळाई रस्‍त्‍यावरील सिमेंट रस्‍त्‍याच्‍या माध्‍यमातून प्रचंड विकास कामे होत असल्‍याचा देखाव्‍याने बार्शी नगरपरिषदेच्‍या निवडणुकीचल वेळ मारुन नेत्‍यात राष्‍ट्रवादीला यश मिळाले. परंतु केवळ ठेकेदारी सुरु करण्‍यापुरते लक्ष देऊन मोठ्या प्रमाणात जनतेच्‍या पैशांची उधळपट्टी आणि निकृष्‍ट दर्जाचे काम त्‍या ठेकेदारामार्फत करण्‍यात आले. नागरिकांनी मोठ्या तक्रारी केल्‍या तरी त्‍याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले. खराव रस्‍ते बनविण्‍यात आल्‍याने प्रचंड सर्वत्र धुळीचे साम्राज्‍य पसरले व त्‍याचा विपरित परिणाम नागरिकांच्‍या आरोग्‍यावर झाल्‍याचे दिसून येत आहे. धुळीच्‍या त्रासामुळे अनेक विकारांनी त्रस्‍त्र झालेले नागीरक औषधोपचार घेत असल्‍याचे दिसून येत आहे.
    कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादीमधील राजकीय वादाच्‍या तक्रारी होत असल्‍याच्‍या चर्चा रंगल्‍या. त्‍यामुळे नागरिकांनीही त्‍याकडे काही प्रमाणात डोळेझाक केली. कोट्यावधी रुपयांच्‍या कामांचा दर्जा तपासणी करण्‍याची जबाबदारी असलेल्‍या अधिका-यांनी स्‍वतःचा हेतू साध्‍य केला आणि अंग झटकून गाव सोडले. राजकीय विरोधकांचा विरोध काही काळापुरता दाखविण्‍यात आला. परंतु निकृष्‍ट दर्जाच्‍या काम करणा-या ठेकेदारांची राजकीय दिशा बदलल्‍याने विरोधकांचा विरोधही मावळला. सर्वसामान्‍य नागरिकांना मात्र स्‍वतःच्‍या आरोग्‍याशी खेळ करुन किंमत चुकवावी लागत आहे. निवडणुका जवळ आल्‍या की सत्‍ताधारी आणि विरोधकांचे कार्यकर्ते सेटलमेंट करुन राजकीय नेत्‍यांना पायघड्या घालतात व स्‍वतःच्‍या घरात स्‍वतःची अब्रू वेशीला टांगून मोठ्या दिमाखाने आरत्‍या ओवाळतांना दिसून येतात. नगरपरिषदेतील अधिकारी कधीतरीच जागेवर दिसून येतात आणि ब-याच वेळा त्‍यांच्‍या जागेवर प्रभारी आपली निष्‍ठापूर्ण कामगिरी चोख बजावतात. कॉंक्रीटच्‍या रस्‍त्‍याचे काम करताना पूर्वी असलेल्‍या डांबरी रस्‍त्‍याची खोदाई करुनच त्‍या ठिकाणी काम करण्‍याची निविदा असतांना जेवढी खोदाई करणे गरजेचे होते. त्‍यापेक्षा पंचवीस टक्‍केदखील खोदाई करण्‍यात आली नाही. ब-याच ठिकाणी तर डांबरी रस्‍त्‍यावरच सिमेंटचा रस्‍ता करण्‍यात आला. लोखंडी सळईचा वापर निविदेतील दाखविल्‍यापेक्षा प्रत्‍यक्ष कामात दहा टक्‍केदखील वापर करण्‍यात आला नाही. खडीच्‍या आणि मुरुमाच्‍या किंमतीत प्रचंड तफावत असल्‍याने ब-याच ठिकाणी मुरुमाचा थर मोठ्याप्रमाणात करण्‍यात आला. सिमेंटचा दर्जा, त्‍यातही वाळू, खडी, सिमेंटचे चुकीचे प्रमाण, रस्‍त्‍यातील चढ-उतार, पूर्वीच्‍या पाईपलाईनची तोडफोड, सांडपाण्‍याच्‍या गटारांची नादुरुस्‍ती, प्रमाणापेक्षा जादा पूर्वीच्‍या रस्‍त्‍यापेक्षा उंच रस्‍ता करण्‍यात आल्‍याने अनेकांच्‍या गटारींचे पाणी साठून राहिले त्‍यामुळे आरोग्‍याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. रस्‍त्‍याचे काम सुरु केंव्‍हा सुरु, ठेकेदाराने किती रक्‍कम उचलली? किती देणे गरजेचे होते? कोणत्‍या अधिका-याने त्‍याची तपासणी केली? सिमेंट रस्‍त्‍यावर किती दिवस पाणी मारले? प्रत्‍यक्षात किती रक्‍कमेचे काम झाले? कोणते ठेकेदार जगविण्‍यात आले? नेमके कोणाच्‍या सांगण्‍यावरुन त्‍याच ठेकेदाराच्‍या निविदा मंजूर करण्‍यात आल्‍या, असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले असले तरी त्‍यापेक्षा महत्‍त्‍वाचा प्रश्‍न हा नागरिकांच्‍या आरोग्‍याशी खेळ झाल्‍याने निर्माण झाला आहे.
 
Top