पांगरी (गणेश गोडसे) :- लग्नात हुंडा कमी दिला व मानपान केला नाही, असे म्हणत पतीसह तिघांनी मिळुन नवविवाहितेस अंगावर रॉकेल ओतुन पेटवुन देऊन तिला जिवे ठार मारण्‍याचा प्रयत्न केला. ही घटना घोळवेवाडी (ता. बार्शी) येथे घडली असुन 19 वर्षीय नवविवाहिता उस्मानाबाद येथील ग्रामीण रूग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. याप्रकरणी तिन जणांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे.
    अनुराधा राजाराम उर्फ आबासाहेब घोळवे (वय 19 वर्ष, रा. घोळवेवाडी, ता. बार्शी) असे अंगावर रॉकेल ओतुन पेटवुन दिल्यामुळे भाजलेल्या नवविवाहीतेचे नांव आहे. पेटवुन देऊन जिवे ठार मारण्‍याचा प्रयत्‍न केल्याप्रकरणी पती राजाराम उर्फ आबासाहेब हनुमंत घोळवे, सासु लक्ष्मीबाई उर्फ पंचाबाई हनुमंत घोळवे व सासरा हनुमंत बारीकराव घोळवे यांच्‍याविरूदध पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.
  जखमी अनुराधा घोळवे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, आरोपींनी संगनमत करून सासु लक्ष्मीबाई घोळवे यांनी त्यांच्या अंगावर रॉकेल ओतले व आरोपी पती राजाराम घोळवे यांने काडेपेटीतील काडी ओढुन त्यांना पेटवुन दिले व जिवे ठार मारण्‍याचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत घोळवे या विवाहितेला उस्मानाबाद येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्‍यात आले असुन जखमींची प्रकृती अतिशय गंभिर आहे. अनुराधा घोळवे यांच्या फिर्यादिवरून पांगरी पोलिसांनी तिघांविरूध्‍द गुन्हा दाखल केला आहे. तीनही आरोपींना ताब्यात घेण्‍यात आले असुन अधिक तपास पांगरी पोलिस ठाण्याचे स.पो.नि. बी.डी.होवाळ हे करत आहेत.
 
Top