पांगरी -: पाठीमागील भांडणाचा राग मनात धरून व कोर्टातील केस काढुन घेण्‍याच्या कारणावरून दोन गटात लोखंडी गज, कोयता चाकु व काठीने बेदम हाणामारी होऊन विनयभंगाची घटना रविवार दि. 30 मार्च रोजी वालवड (ता. बार्शी) येथे घडली. दोन्ही गटातील चारजण गंभीर जखमी झाले असुन परस्परविरोधी फिर्यादिवरून दोन्ही गटातील अठरा जणांविरूदध मारहाण करून जखमी करत व विनयभंग केल्याप्रकरणी रविवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.
    सोनाली ज्ञानोबा जाधवर (वय 35), ज्ञानोबा हनुमंत जाधवर, हनुमंत भानुदास जाधवर व मंगल राम जाधवर अशी मारहाणीत गंभीर जखमी झालेल्यांची नांवे असुन उस्मानाबाद व बार्शी येथील वेगवेगळया रूग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत.   जखमी सौ. सोनाली ज्ञानोबा जाधवर या महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्या रविवारी दुपारी त्यांच्या वालवड हदीतील शेतात असताना आरोपी फुलचंद भानुदास जाधवर, रामा भानुदास जाधवर, बाबु उर्फ श्रीनिवास रामा जाधवर, मंगल रामा जाधवर, सुशांत फुलचंद जाधवर, विठ्ठल फुलचंद जाधवर, सोमनाथ बजरंग गाढवे, दैवशाला सोमनाथ गाढवे, स्नेहल रामा जाधवर, अशोक भिमराव बिक्कड व दोन अनोळखी इसम यांनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवुन मागील भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ व दमदाटी करत गालावर, डोक्यात, पायावर लोखंडी गज, कोयता, काठी व चाकुने मारहाण करत गंभीर जखमी केले व जीवे ठार मारण्‍याची धमकी दिली.
  विरोधी गटातील महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, पाठीमागील भांडणाचा राग मनात धरून आरोपी ज्ञानोबा हनुमंत जाधव,र हनुमंत भानुदास जाधवर (दोघे रा. वालवड) व बालाजी देविदास मुंढे, कैलास देविदास मुंढे, देविदास नानाभाऊ मुंढे, (तिघे रा. उपळाई, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) यांनी फिर्यादीच्या शेतातील गोठयावर जावुन गैरकायद्याची मंडळी जमवून तुम्ही केलेले केस मिटवुन घे असे म्हणुन फिर्यादीच्या शरीराशी झोंबाझोंबी करून हात धरून ओढत विनयभंग केला. तसेच शिवीगाळ दमदाटी करत लाथाबुक्यांनी मारहाण करत जीवे ठार मारण्‍याची धमकी दिली. परस्पर विरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटांच्या 18 जनांविरूध्‍द गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. अधिक तपास हवालदार शिवानंद मोसलगी हे करत आहेत.
 
Top