मुंबई :- महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, खान्देश या विभागामध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हातची पिके वाया गेल्यामुळे शेतकरी पूर्णपणे उध्दवस्त झाला आहे. राज्यातील गारपीटग्रस्त शेतक-यांना मदतीसाठी मुंबई विद्यापीठातील कर्मचारी सरसावले आहेत. मुंबई विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी आपल्या एक दिवसाचा संपूर्ण पगार शेतक-यांच्या मदतीसाठी देण्याचे नुकतेच जाहीर केले आहे.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजन वेळुकर, कुलसचिव एम.ए.खान, बीसीयुडी संचालक प्राचार्य डॉ. राजपाल हांडे, परीक्षा नियंत्रण डॉ. पद्मा देशमुख, वित्त व लेखा अधिकारी अशोक फाळणीकर, विद्यापीठातील उपकुलसचिव तसेच सहाय्यक कुलसचिवांनी मार्च महिन्यातील आपला एक दिवसाचा पूर्ण पगार गारपीठग्रस्त शेतक-यांना मदत म्हणून देण्याचे जाहीर केले आहे.