कळंब -: दाभा (ता. कळंब) शिवारातील सर्व्हे नंबर 67 मधील बैलाचा गोठा व शेती अवजारे, रब्बीचा हरभरा आणि लसूण, वाड्याची गंज अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाली. ही घटना मंगळवार दि. 25 मार्च रोजी दुपारी घडली. यात शेतक-यांचे जवळपास पन्नास हजाराच्यावर नुकसान झाले आहे.
हिगणगाव (ता. कळंब) येथील विठ्ठल हरिभाऊ जाधव यांची दाभा शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतातील बैलाचा गोठा, लसुण, रब्बीचा काढलेला हरभ-याचा ढीग, ऊसाच्या वाड्याची गंज, दोन मोठ्या आंब्याची झाडे मंगळवारी दुपारी लागलेल्या अचानक आगीत जळून खाक झाली. यात त्या शेतक-याची सर्व रब्बीची पीके जळून झाल्याने त्यास शासनाच्या आर्थिक मदतीची गरज आहे. या जळीताची तलाठी यांनी पाहणी करुुन जळालेल्या मालाची यादी व पंचनामा महसूल खात्याला सादर केली आहे. या गोठा, लसून, अवजारे 15 हजार, हरभरा पिक 21 हजार, वाड्याची गंज 20 हजार व आंब्याची दोन झाडे 5 हजार असे एकूण 43 हजार रुपयाचे नुकसान झाल्याचे दाखविले आहे. तर यात त्या शेतक-याचे जवळपास पन्नास हजाराच्यावर नुकसान झाले. या नुकसानीची शासनाने तात्काळ त्या शेतक-यास आर्थिक मदतीची गरज आहे. आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी हळहळ व्यक्त करीत आहेत.