कळंब -: उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतक-यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील यावर्षीची सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करुन विद्यापीठाने घेतलेल्या फीस तात्काळ परत करण्याची मागणी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेच्यावतीने कळंब तहसिलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वत्र गारपीट व अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. अनेक गोरगरीबांचे घरे उध्दवस्त झाली. खाण्यासाठी देखील अन्न राहिले नाही. गोरगरीब जनतेने स्वतःच्या मुलांसाठी व शेतीसाठी गावातील सोसायटी, बँका व शैक्षणिक कर्ज घेऊन आपली गरज भागविली होती. पण अचानक झालेल्या या गारपीटीमुळे शेतक-यांचे नुकसान झाले. तसेच ज्या पिकांच्या जीवचावर बँकातून कर्ज घेतलेले होते. ते पिके नासधूस होऊन मातीत मिळाली. शेतक-यांच्या पदरात काहीच उरले नाही. दोन वेळेच्या अन्नासाठी देखील आज वणवण फिरावे लागते आहे. अत्यंत बिकट परिस्थिती येथील जनतेवर निर्माण झाली आहे. तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करण्यात यावी, तसेच विद्यापीठाने घेतलेल्या फीस तात्काळ वापस करण्यात यावा व गारपीटग्रस्त नागरिकांना न्याय द्यावा, अशी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सागर बाराते, उपजिल्हाध्यक्ष बालाजी सुरवसे, कळंब शहराध्यक्ष राजेश काळे आदींच्या स्वाक्ष-या आहेत. निवेदनाची माहितीस्तव एक प्रत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडज्ञ विद्यापीठ औरंगाबाद, जिल्हाधिकारी उस्मानाबाद आदींना पाठविण्यात आल्या आहेत.