पांगरी -: बार्शी तालुक्‍यातील पांगरी, उक्कडगांव भागात अज्ञात साथीच्या आजाराने लाखमोलाची जनावरे मृत्युमुखी पडण्‍याची मालिका सुरू असताना व त्याकडे लक्ष देण्‍यास कोणालाच वेळ नसताना 'तुळजापूर लाईव्‍ह' ने या पशुपालकांच्या गंभीर प्रश्‍नावर सडेतोड पदधतीने प्रकाशझोत टाकुन तालुका प्रशासनाला जाग आणुन उक्कडगांव येथे जनावरांना रोग प्रतिबंधक लसीकरण करण्‍यास भाग पाडले. उशिरा का असेना उक्कडगांवात लसीकरण मोहिम राबवण्‍यात आल्यामुळे पशुपालकांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे.
    अनेक जनावरे मृत्युमुखी पडल्यानंतर व कांही जनावरांमध्ये मृत जनावरांप्रमाणेच लक्षणे जाणवू लागल्याने पांगरी पशुवैद्यकीय दवाखान्याच्या पथकाने उक्कडगांव येथे जावुन तेथे कँम्प लावुन 500 जनावरांना रोग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम राबवण्‍यात सुरु केली आहे. उक्कडगांव येथील लसीकरण मोहिमेनंतर पांगरी पशवैद्यकीय रूग्णालयांतर्गत येणा-या पांढरी, पांगरी, चिंचोली, ढैम्बरेवाडी, घोळवेवाडी, कारी, झानपुर, ममदापुर, पाथरी, शिराळे, घारी आदी गावातील जनावरांना रोग प्रतिबंधात्मक लसीकरण करण्‍यात येणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले.
    पांगरी भागातील उक्कडगांव (ता. बार्शी) या डोंगरी गावात गत आठवडयात अज्ञात साथीच्या आजाराने अनेक दुभत्या गायी म्हशींसह बैल, कालवड, शेळया आदी जनावरे मृत्युमुखी पडली होती व कांहीमध्ये तशाच प्रकारची लक्षणे दिसुन येऊ लागली होती. अनेक पशुपालकांच्या अक्षरक्षः दावणीच मोकळया झाल्या होत्या. उक्कडगांव येथील एका एकाच्या पाच पाच दुभत्या गायी मृत्युमुखी पडुन त्यांचे दीड ते दोन लाख रूपयांपर्यंत नुकसान झाले होते. अशापध्‍दतीनेच अनेकांच्या गायी, म्हशी, बैल मृत्युमुखी पडत होते. पण या प्रकाराकडे कोणीच गांभिर्याने पाहत नव्हते. पशुपालकही झाले गेले असे म्हणुन व नशिबालाच दोष देत आपली लाखमोलाची जनावरे जमिनीत गाडुन विषय संपवुन टाकत होते.    
    पशुधन विभागाच्या पथकाने उक्कडगांवला भेट देऊन जनावरांची पहानी करून तेथे लसीकरण मोहिम राबवण्‍याचे जाहीर केले होते. त्यानुसार पशुधन विभागाच्या पथकाने उक्कडगांव येथे जावुन तेथील जवळपास पाचशेच्या आसपास पशुधनाला लसीकरण माहिम राबवुन जीवदान देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. लसीकरण मोहिम तर राबवण्‍यात आली असुन आता या मोहिमेचा मुक्या जनावरांना कितपत लाभ होणार हे पाहावे लागणार आहे. जनावर मरण पावल्यामुळे उक्कडगांव, पांगरी येथील दुध उत्पादक व पशुपालक शेतकरी मात्र पुर्णपणे हताश झाला असुन आता त्यांच्यापुढे जगण्‍यासाठी संघर्ष करण्‍याचा बाका प्रसंग उभा राहीला आहे. एकंदर निराशेतुन मार्ग काढण्यासाठी येथील मृत जनावरांच्या पशु पालकांना शासनाने कांहीतरी मदतीचा हात द्यावा व त्यांना पुन्हा उभे करावे अशी मागणी होत आहे.
 
Top