कळंब -: बालशिक्षण हक्क 2009 कायद्यानुसार राज्यातील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग कोणतीही अट न ठेवता प्राथमिक शाळेला जोडावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी शालेय शिक्षणमंत्री ना. राजेंद्र दर्डा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यात सन 2010 पासून नवीन बालशिक्षण हक्क 2009 कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणे बंधनकारक आहे. या कायद्यानुसार इयतत पहिली ते इयत्ता पाचवीचे पर्यंतचे प्राथमिक शिक्षण असून इयत्ता सहावी ते आठवणीपर्यंत उच्च प्राथमिक शिक्षण आहे. सध्या प्रचलित पध्दतीने इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण प्राथमिक शाळेत दिले जात आहे. इतर राज्यात मात्र इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत प्राथमिक शाळा आहेत. पण महाराष्ट्र राज्यात इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे प्राथमिक शाळेत भरवले जातात. यामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होणार असून इतर ठिकाणी त्यांचे समायोजन करणे प्रशासानाला शक्य होणार नाही.
तरी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत व खासगी संस्थेमार्फत चालवल्या जाणा-या इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत प्राथमिक शाळेला इयत्ता पाचवीचा वर्ग जोडण्यात यावा. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत चालवल्या जाणा-या प्राथमिक शाळेला आठवीचा वर्ग विनाअट जोडण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने शालेय शिक्षणमंत्री ना. राजेंद्र दर्डा यांच्याकडे करण्यात करण्यात आली. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष, शिक्षण सभापती यांना देण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, मार्गदर्शक प्रा.एस.डी. पाटील, अध्यक्ष राजराम वरुटे, कार्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, कोषाध्यक्ष अंबादास वाजे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.