बार्शी (मल्लिकार्जून धारूरकर) -: मे महिन्याच्या तीन तारखेपर्यंत संकटग्रस्त शेतकर्‍यांना अनुदान मिळण्यासाठी पंचनामे करण्याचे काम पूर्ण करावे अन्यथा शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहेत अशी माहिती शेतकरी संघटना युवा जिल्हा अध्यक्ष शंकर गायकवाड यांनी दिली.
    याबाबत बोलताना गारपीटीच्‍या नैसर्गिक संकटामध्‍ये शेतक-यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.  शासनाच्‍यावतीने गारपीटग्रस्‍त शेतक-यांसाठी अनुदान जाहीर करण्‍यात आले आहे. बार्शी तहसिल कार्यालयास त्‍याबाबत पंचनामे करण्‍याच्‍या सूचना व आदेश देण्‍यात आले होते. परंतु कर्मचा-यांनी यातील नुकसानग्रस्‍त शेतक-यांचे पंचनामे करण्‍याऐवजी मर्जीतील अथवा सोयीस्‍कर पध्‍दतीने पंचनामे करुन शेतक-यांवर अन्‍याय केला आहे. दुष्‍काळापाठोपाठ गारपीटीचे संकट आल्‍याने शेतकरी अगोदरच निराश झालेला आहे. त्‍यामध्‍ये अनुदानातील असमानता, अल्‍प अनुदान, तसेच जाणीवपूर्वक काही शेतक-यांना यातून वगळण्‍यात आल्‍याने शेतक-यांमध्‍ये उद्रेक निर्माण झाला आहे.
    शेतक-यांनी वेळोवेळी तहसिलमध्‍ये भेट घेऊन चौकशी केली असता निवडणुकीच्‍या कामात व्‍यस्‍त असल्‍याचे सांगण्‍यात आले. काही जणांनी आपल्‍याकडे यासंदर्भात माहिती नसून यासाठी वेगळ्या कर्मचा-यांची नियुक्‍त केल्‍याचे, दोन दिवस थांबा असे वेगवेगळी उत्‍तरे देऊन दिशाभूल करण्‍यात आली. प्रत्‍येक गावात यादी लावण्‍यात येईल, असे सांगण्‍यात आले. मात्र प्रत्‍यक्षात कोणालाही पंचनामे अथवा अनुदान मिळालेल्‍या शेतक-यांची माहिती उपलब्‍ध करण्‍यात आली नाही अथवा नेमके काय चालू आहे याची माहिती देण्‍यात आली नाही.
 
Top