कळंब (भिकाजी जाधव) :- कळंब तालुक्यात अजूनही पाऊस पडलेला नसल्यामुळे खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे बळीराजा पुरता धास्तावला असून तो पावसाच्या प्रतिक्षेत आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.
दोन वर्षापूर्वी म्हणजे सन 2012 मध्ये भयान दुष्काळ पडला होता. त्यानंतर गतवर्षी अगोदरपेक्षा बरा म्हणत थोडाफार पाऊस झाला. मात्र यंदा तर निसर्गाने कहरच केला. चक्क हिवाळा व उन्हाळ्यात भयंकर मोठी गारपीठ झाली. हाता-ताेंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. यंदा पर्जन्यमान कमी असल्याने हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे बळीराजा मात्र पुरता गारद झाला आहे. मृग नृक्षत्र येवून गेला पण पाऊस काय पडला नाही. आज ना उद्या, किमान वारी माघारी फिरल्या वर तर पाऊस पडेल, या आशेवर बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.
कळंब तालुक्यातील मोठमोठ्या तलाव आणि प्रकल्पांनी तळ गाठला आहे. तर विहीरी कोरड्याठाक पडल्या आहेत. तर बोअरनी दम तोडायला सुरुवात केली आहे.