बार्शी (मल्लिकार्जुन धारुरकर) -: भाऊसाहेब आंधळकर, राजेंद्र राऊत, राजेंद्र मिरगणे हे तिघेही शिवसेनेचे काम जोमाने करतील तिकीट कोणालाही मिळो ते शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा प्रचार करा. शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करण्याची जबाबदारी तुमची, व ज्यांना तिकीट नसेल त्यांची जबाबदारी माझी असेल. विरोधक तुमच्यामध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहेत तुम्ही एकमेकांच्या तंगड्या ओढू नका, असे उध्‍दव ठाकरे यांनी बार्शी येथे जाहीर सभेत बोलताना सांगितले.
    शिवसेना पक्षाच्या माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र या राज्यव्यापी दौर्‍यातील बार्शीच्या श्री भगवंत मैदानावर विराट जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरुरकर, रामदास कदम, धाराशिव मतदार संघाचे खासदार रविंद्र गायकवाड, उत्तमप्रकाश खंदारे, शिवशरण पाटील, इंडीचे रवि पाटील, संपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, माजी आमदार राजेंद्र राऊत, भाऊसाहेब आंधळकर, काका गायकवाड, ओमराजे निंबाळकर, विश्वास बारबोले, केशव घोगरे, शिवाजी सावंत, बाबासाहेब कापसे आदी उपस्थित होते.
    उध्‍दव ठाकरे म्हणाले, हिंदु ह्दयसम्राट शिवसेनाप्रमुखांनी बार्शीच्‍या भगवंत मैदानावर 2004 साली घेतलेल्‍या प्रचंड जाहीर सभेची आठवण आली. त्‍यावेळी मिळालेल्‍या विजयाची पुनरावृत्‍ती होईल. राऊत यांना विरोधकांकडे जाण्‍याचा अनुभव आला ते बरे झाले त्‍यांनाही कळले शिवसेना सोडल्‍यावर काय होते.  आज अनेकजण तळमळत आहेत व ना घरका ना घाटका अशी त्‍यांची अवस्‍था आहे. शिवसैनिकांचे प्रचंड प्रेम हे त्‍यांच्‍या नशिबी नाही. अशी जीवाभावी माणसे त्‍यांच्‍याकडे नाहीत, त्‍यांच्‍याकडे केवळ पैसा आणि त्‍याची मस्‍ती आहे. इथे आलेले मतदार हे भाड्याने आणलेले अथवा भाडखाऊ नाहीत. विरोधक सूडाचे राजकारण करत आहेत. परंतु ते नामशेष होतील. त्‍यांच्‍या सात पिढ्या काय सातशे पिढ्या गेल्‍या तरी शिवसैनिक त्‍यांना गाढून त्‍यांच्‍या उरावर भगवा फडकवेल. आज धरणं कोरडी आहेत, शेतकरी पावसाकडे अन् आकाशाकडे नुसता पाहतो आहे. दुबार पेरणीचे संकट असून शेतक-यांच्‍या जमिनी गहाण पडत आहेत. पत्नीचे दागिने गहाण पडत आहे, बैलजोड्या गहाण पडत आहेत. नांगरणीसाठी स्‍वतःची पत्‍नी व मुलांना जोखडांना बांधून नांगरणी करण्‍याची वेळ आली आहे. कारण त्‍यांच्‍या मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्‍न, आई वडिलांची काळजी याच्‍यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतक-यांच्‍या प्रश्‍नासाठी अधिका-यांकडे वेळ नाही. महाराष्‍ट्राला उज्‍वल परंपरा आहे. परंतु राष्‍ट्रवादी आणि कॉंग्रेसच्‍या डोक्‍यात प्रकाश पडला नाही. त्‍यांना स्‍वतःच्‍या तुंबड्या भरण्‍याव्‍यतिरिक्‍त वेळ नाही. त्‍यामुळे त्‍यांचा एकही उमेदवार निवडून येता कामा नये. इतके दिवस कृषीमंत्री पद असलेल्‍या शरद पवारांना शेतक-यांच्‍या प्रश्‍नासाठी कधी काही सुचले नाही. आता मोदींच्‍या जवळ जाऊन फोटो काढत आहेत. त्‍यावेळी शेतक-यांसाठी पैसा आणायला का सुचले नाही. धरणं ओस पडली असताना 26 लवासा सारखे प्रकल्‍प उभारण्‍याच्‍या गप्‍पा मारत आहेत, या कोणाला उपयोग आहे? सर्वसामान्‍य शेतक-यांना याचा काय उपयोग आहे? हिलस्‍टेशन करण्‍याअगोदर धरणांचा प्रश्‍न प्राधान्‍याने सोडवणे गरजेचे आहे. स्‍वतःच्‍या खानदानाच्‍या नावांची कॉलेज, कारखाने उभके करुन जनतेच्‍या पैशावर स्‍वतःच्‍या तुंबड्या भरुन वरुन शेखी मिरवत आहे अन् बाळासाहेबांनी काय केले असे निर्लज्‍जपणे बोलत आहेत. होय बाळासाहेबांनी कारखाने, कॉलेज नसतील काढले परंतु राष्‍ट्रभत निर्माण केले, मर्द शिवसैनिकांच्‍या पिढ्या उभ्‍या केल्‍या, तुमच्‍यासारखे पापी राजकारण नाही केले. पोलीस भरतीच्‍या नावाखाली तरुणांना धावायला लावले, खायची बोंब, पाणी नाही, कुटुंबास पोसण्‍यासाठी त्‍यांना जीवघेणे पळायला लावले अन् पाच तरुणंना प्राण गमवावे लागले. अशा जीवघेण्‍या स्‍पर्धा थांबविल्‍याशिवाय राहणार नाही. पोलिसांनी दांडूका मारायला असेल तर न्‍यायाने मारावा, अन्‍यायाने सहन करणार नाही. महिलांच्‍या संरक्षणासाठी घर तिथे शिवसैनिक तयार करु, तेच भाऊ म्‍हणून रक्षण करतील, असेही उध्‍दव ठाकरे म्‍हणाले.
 
Top