बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत असलेल्या शिवाजी महाविद्यालयाच्या ७०० विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २५०० प्रमाणे १७ लाख ५० हजार रुपये बेकायदा व दमदाटी करुन वसूल केले. या प्रकारातून विद्यार्थ्यांचा एकप्रकारे खिसा कापला गेल्याने बेकायदा सुरु केल्या उन्हाळी वर्ग सुरु करुन विद्यार्थ्यांचे घेतलेले साडेसतरा लाख रुपये परत मागण्यासाठी सर्व विद्यार्थी रस्त्यावर उतरले.
     या संस्थेची उभारणी करतांना कर्मवीर डॉ.जगदाळे मामा यांनी गावोगावी फिरुन ज्वारी व देणग्या गोळा करुन संस्था उभारली, गरिब शेतकर्‍यांच्या मुलांना चांगले शिक्षण मोफत अथवा अल्प दरात मिळावे ही त्यांची प्रामाणिक तळमळ होती. त्यांच्या पश्यात संस्थेत घुसलेल्या दलालांनी शिक्षणाचा धंदा करुन विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात लुट चालू केली असल्याने कर्मवीरांच्या नावाला कलंक लावण्याचा प्रकार झाला आहे.
    यावेळी केलेल्‍या आंदोलनातील विद्यार्थ्‍यांवर दबाव टाकण्‍यासाठी काही शिक्षकांनी आंदोलनकर्त्‍यांना दमदाटी करुन अंतर्गत परीक्षांचे मार्क देणार नाही, काही विद्यार्थ्‍यांना महाविद्यालयातून काढून टाकू, तर काही विद्यार्थ्‍यांना परीक्षेला बसू देणार नाही, अशा वेगवेगळ्या धमक्‍या देवून एकाने तर चक्‍क फोन करुन पोलिसांना बोलावून विद्यार्थ्‍यांना धमकावण्‍याचा प्रयत्‍न केला. मुलांनी एकजूट व वेळीच पत्रकारांची उपस्थिती राहिल्‍याने हतबल झालेल्‍या पोलिसांनी, संबंधित शिक्षकांनी व प्राचार्यांनी वेळेचे भान राखून विद्यार्थ्‍यांसमोर शरणागती पत्‍करली. विद्यार्थ्‍यांकडून पावती न देता तसेच बेकायदा वसूली केलेले साडे सतरा लाख रुपये सर्व विद्यार्थ्‍यांना आठ दिवसात परत देण्‍याचे प्राचार्य मधुकर फरताडे यांनी हताशपणे सर्व विद्यार्थ्‍यांसमोर कबूल केले. सन 2006 पासून प्रत्‍येक वर्षी विद्यार्थ्‍यांकडून अतिरिक्‍त शिकवणी वर्गाची फी गोळा करण्‍यात येते. सुरुवातीला पहिल्‍या वर्षी सर्व विद्यार्थ्‍यांना पावत्‍या देण्‍यात आल्‍या. परंतु काही जणांनी माहितीचा अधिकार वापरुन माहिती गोळा केल्‍यावर  बेकायदा फी वसुलीचा धंदा उघडा पडला. यानंतर कोणत्‍याही विद्यार्थ्‍यांना पावती देण्‍यात येत नव्‍हती. त्‍यानंतर विद्यार्थ्‍यांना कधी बँकेतील सांकेतीक खात्‍यावर जमा करायला लावून एक नंबरमधून दोन नंबरचे बेकायदा धंदे सुरुच ठेवले. शिक्षकांकडून देण्‍यात येणा-या धमक्‍या, मार्कची भीती व स्‍वतःचे करिअर खराब होऊ नये म्‍हणून संस्‍थाचालक आणि शिक्षकांमधील साठ चाळीसच्‍या गोरखधंद्याचे बळी विद्यार्थी पडत होते.
    सन 2006 पासून विद्यार्थ्‍यांकडून मोठ्याप्रमाणात पैसे गोळा करुन परस्‍पर विल्‍हेवाट लावली जाते, एका वर्षी साडे सतरा लाखांचा हिशोब लागतो तर मागील आठ वर्षापासून कोट्यावधी रुपयांचा हिशोब कोण मागणार? हा प्रश्‍न शेवटी अनुत्‍तरीच राहतो.
 
Top