उस्मानाबाद :- नापिकी, गारपीट, आवर्षण, अशा निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त बळीराजाला शेतकरी कामगार पक्षाने ठामपणे बळ दिले आहे. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांचा आर्थिक कोंडमारा दूर करण्यासाठी व त्यांच्याप्रत सहवेदना व्यक्त करण्यासाठी जिल्हा पत्रकार संघाच्या मदतीने ७० विद्यार्थी आणि पाच आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटूंबियांना ११ लाख रूपयांच्या मदतीचा हात देण्यात आला आहे. शेकापने पुढे केलेला हा मायेचा हात पाहून उपस्थितांचे डोळे आपसूक पाणावले. 
         शेतकरी कामगार पक्ष आणि उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, २९ डिसेंबर रोजी शहरातील मेघमल्हार सभागृहात आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटूंबियांना आणि दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी शेकापचे आमदार विवेक पाटील, रायगड माजी जि. प. अध्यक्ष बाळाराम पाटील, प्रकाश म्हात्रे, मल्लीनाथ गायकवाड, सचिन तडङ्गळे, प्रा. अमोल दिक्षीत, किरण खपले, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदर आदि यावेळी उपस्थित होते. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी बाबासाहेब माणिक जगताप (रूईभर), तानाजी एकनाथ कदम (पांगरवाडी), त्र्यंबक सोपान चव्हाण (चव्हाणवाडी), बालाजी सुबराव बागल (शिंगोली), शंकर रामा लांडगे (मेंढा), व बापू दगडू गायकवाड (सरमकुंडी) या शेतकर्‍यांच्या विधवा पत्नींना मदतीचे धनादेश दिले. तसेच शेकापने ५० मुलांचे तिन वर्षाकरीता पालकत्व स्विकारले. त्यापैकी ८ मुलांना प्रतिनिधीक स्वरूपात आज मदत दिली. विधवा पत्नींना ३० हजार रोख, ७० हजार रूपयांची बँक मुदत ठेव, आई-वडीलांना प्रत्येकी १० हजार मदत, व मुलांना शिक्षणासाठी ५ व १० हजार रूपये रोख, असे मदतीचे स्वरूप होते.
         पनवेलचे भाई बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शेकापने हा उपक्रम राबविला. त्यासाठी उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाने यात सहभागी होऊन एका चांगल्या उपक्रमाला साथ दिली. जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या या गंभिर विषयाकडे शेकापने लक्ष वेधले व येथील शेतकर्‍यांसाठी मदत करण्याचा प्रयत्न केला. पत्रकार संघाने जिल्ह्यातील सहा शेतकरी कुटूंबियांची प्राथमिक स्वरूपात निवड केली. ज्यांनी आत्महत्या केली त्याची कारणे व त्या समस्येवर उपाय सुचविले व त्यानुसार आज येथील मेघ मल्हार हॉलमध्ये या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियास मदत वाटप केली. यावेळी बोलताना शेकापचे विवेक पाटील यांनी, शेकाप लहान पक्ष असला तरी ती एक सामाजिक चळवळ आहे व आम्ही कायम बळीराजासोबत आहोत. त्यांचे दु:ख कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले. सरकार कुठलेही असो त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आज शेतकर्‍यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. आमचा पक्ष लहान आहे. पण आम्ही हा पक्ष न समजता सामाजिक चळवळ समजतो व त्यादृष्टीने काम करतो. वाढदिवसावर पैसा खर्च न करता त्यातुन कांही कुटूंबांना आधार देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच मागच्या वर्षी आम्ही पारनेरमध्ये काम केले. यावेळी तुळजापूर व उस्मानाबाद येथे काम करणार आहोत. यासाठी पत्रकार संघाने दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाला पुन्हा कर्जबाजारीपणाला सामोरे जावे लागू नये अशी मदत करत आहोत. ही मदत म्हणजे केवळ सुरूवात आहे. ज्या विधवा भगिनी अथवा मुले व्यवसाय करू इच्छितात त्यांनाही यापुढे व्यवसायासाठी मदत केली जाईल. शेतकरी मुलींची लग्न यामुळेही कर्जबाजारी होते. हे लक्षात घेऊन त्या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळाही आयोजित करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. दुष्काळावर कायम उपाय योजनासाठी जिल्ह्यातील दोन गावे दत्तक घेऊन तेथे जलसंधारणाची कामे केली जातील असेही त्यांनी म्हटले.
         ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविला ते बाळाराम पाटील यावेळी बोलताना म्हणाले, पनवेलमध्ये वाढदिवस साजरा करताना असंख्य गुच्छ जमा होता. आठवडाभर भरगच्च कार्यक्रम होतात. हा सगळा पैसा व्यर्थ जातो. त्यामुळे यावेळी वाढदिवस न साजरा करता हा पैसा शेतकर्‍यांसाठी मदत म्हणून देण्याचा विचार आ. विवेक पाटील यांनी मांडला. त्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याची निवड केली. वास्तविक ही मदत ङ्गार आहे असे नाही. पण यातून त्यांना आता रोख मदत, भावी काळासाठी मुदत ठेव रक्कम देत आहोत. जेणेकरून पुन्हा कर्ज काढण्याची वेळ येणार नाही. मुलांच्या शिक्षणाचाही भार उचलत आहोत. कारण अशा शेतकर्‍यांची भावी पिढीसुद्धा घडावी हा हेतू आहे. हा उपकार नाही तर त्यांच्या प्रती सहवेदना आहेत अशी भावना व्यक्त केली. यावेळी सचिन तडङ्गळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार रविंद्र केसकर तर आभार प्रा. अमोल दिक्षीत यांनी मानले.
 
Top