उस्मानाबाद - -महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या वतीने वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी जिल्हास्तरावर ग्रंथोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने दि. 2 ते 4 मार्च, 2015 या कालावधीत सांस्कृतिक सभागृह, आनंदनगर, उस्मानाबाद येथे ग्रंथोत्सव-2015 या ग्रंथप्रदर्शन व विक्री उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाडा तसेच राज्यातील विविध मान्यवर पुस्तक प्रकाशकांचा सहभाग, विविध महाविद्यालयांच्या सहभागाने निघणारी साहित्य जागर दिंडी, युवकांसाठी अवांतर वाचन आणि स्पर्धा परीक्षेबाबतचे महत्व सांगणारे व्याख्यान, जिल्ह्यातील मान्यवर कवींचा सहभाग असणारा काव्यसंध्या हा कार्यक्रम, ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार, शेतकऱ्यांच्या जीवनसंघर्षाची कहाणी कवितेतून मांडणाऱ्या मराठवाड्यातील नामवंत कवींची काव्य मैफील आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा राजकारणापलीकडचं जीवन प्रवास सांगणारा दिलखुलास संवाद हे या ग्रंथोत्सवाचं विशेष वैशिष्ट्य असणार आहे. 
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उस्मानाबाद येथील सांस्कृतिक सभागृह आनंदनगर येथे सलग तीन दिवस हा कार्यक्रम सुरु राहणार आहे. दि. 2 मार्च रोजी सकाळी 8 वाजता साहित्य जागर दिंडीने या उपक्रमाला सुरुवात होईल. शहरातील 7 शाळा-महाविद्यालयातून एकाचवेळी या दिंडीची सुरुवात होऊन ती सकाळी 10 वाजता कार्यक्रमस्थळी येईल. संबंधीत शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, सहकारी शिक्षक, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी, मराठवाडा साहित्य परिषदेचे  प्रतिनिधी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि जिल्ह्यातील वाचनालयांचे प्रतिनिधी यांचा या साहित्य जागर दिंडीत सहभाग असणार आहे. सकाळी 10 वाजता ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे.
सायंकाळी 5 ते 6-30 या वेळेत ग्रंथोत्सवाच्या उदघाटनाचा सोहळा रंगणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन होणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, जिल्हा पोलीस प्रमुख अभिषेक त्रिमुखे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रणजीत हांडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी शशीमोहन नंदा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांचे आजचा युवक, अवांतर वाचन आणि स्पर्धा परीक्षा या विषयावर व्याख्यान होणार आहे.
पहिल्या दिवशी सायंकाळचे सत्र (सायं 7 ते रात्री 9-30) निमंत्रित कवींच्या कवितांनी रंगणार आहे. जिल्ह्यातील मान्यवर कवींचा यात सहभाग असणार आहे. 
दि. 3 मार्च रोजी सकाळी  11 वाजता जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार प्रख्यात लेखक प्रा. मिलींद जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रा. जोशी यांचे आचार्य अत्रे आणि पु.ल. देशपांडे- विनोदाची दोन शिखरे या विषयावर व्याख्यान होणार आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ॲड. कुलदीप (धीरज) पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. मराठवाडा विभागाचे माहिती संचालक राधाकृष्ण मुळी, अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. उबाळे, जिल्हा कोषागार अधिकारी राहुल कदम यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता बळीराजाच्या कविता हा शेतकऱ्यांची जीवनकहाणी शब्दातून मांडणाऱ्या विशेष काव्यमैफिलीचा कार्यक्रम होणार आहे. मराठवाड्यातील बालाजी इंगळे, प्रमोद माने, शंकर वाडीवाले, चंद्रशेखर मलकमपट्टे,  प्रा. ललित अधाने, अरुण पवार, प्रा. अरविंद हंगरगेकर, अंबादास केदार, किसन घारुळे आणि रवींद्र केसकर हे नामवंत कवी यात सहभाग घेणार आहेत.  
दि. 4 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा राजकारणापलीकडचे व्यक्तीमत्व उलगडणारा दिलखुलास संवाद कार्यक्रम होणार आहे. यात ज्येष्ठ आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार राणा जगजीतसिंह पाटील, आमदार राहुल मोटे, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह औरंगाबाद शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे आणि पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे.
ग्रंथोत्सवात तीनही दिवस सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत ग्रंथप्रदर्शन रसिक वाचकांसाठी खुले राहणार असून जिल्ह्यातील रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबादच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमास मराठवाडा साहित्य परिषदेची उस्मानाबाद शाखा, नगरवाचनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, आकाशवाणी आणि जिल्हयातील सर्व प्रसारमाध्यम प्रतिनिधींचे सहकार्य लाभले आहे. 

 
Top