उस्मानाबाद - जिल्ह्यात श्री गणेशोत्सव, मुस्लीमबांधवांचा बकरी ईद हे सण सर्वत्र साजरा होणार आहेत, मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे तसेच गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करावा,या मागणीसाठी आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे, विविध पक्ष व संघटना यांच्यावतीने त्यांच्या विविध मागण्यासाठी (मुस्लीम आरक्षण , चारा टंचाई , पाणी टंचाई या कारणामुळे ) अचानकपणे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अप्पर जिल्हादंडाधिकारी,उस्मानाबाद यांनी संपूर्ण जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी दि.23 सप्टेंबरचे 6 वाजेपासून ते 7 ऑक्टोबर चे मध्यरात्रीपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) व 37 (3) अन्वये शस्त्रबंदी व जमावबंदीचा आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार जिल्हयात नागरीकांना शस्त्र किंवा तत्सम वस्तु बाळगण्यास अथवा त्यांची वाहतूक करण्यास बंदी राहील. आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नक्कला करता येणार नाही. सभ्यतेस व नितिमत्तेस बाधा येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, नकाशे, घोषणा फलक, चिन्ह आणि अशा अन्य वस्तु जवळ बाळगता येणार नाहीत. व्यक्ति किंवा समुहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याच्या उद्देशाने वाद्य वाजविता येणार नाही अथवा गाणी म्हणता येणार नाहीत. तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तिंना एकत्र येण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचा भंग करणा-यांविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.