उस्मानाबाद -: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एक दिवस मजुरासोबत या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी व त्यांच्या चमूने भाग घेऊन सर्वसामान्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडी-अडचणी सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी जिल्ह्यातील गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन संपूर्ण एक दिवस कार्य तत्पर सेवा केली. जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये दि.1ऑक्टोबर रोजी एक दिवस मजूरांसोबत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
            या कार्यक्रमासाठी जिल्हास्तरावरुन प्रत्येक मंडळातील एका गावामध्ये जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची नियुक्त करण्यात आली होती.  तसेच स्थानिक लोकप्रतिनीधी यांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभली होती. 
              उस्मानाबाद तालुक्यातील लासोना या गावी जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, जि.प.उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीरंग तांबे, उपविभागीय अधिकारी तेजेस चव्हाण, तहसिलदार सुभाष काकडे,गटविकास अधिकारी श्री.आर.व्ही.चकोरे,तालुका कृषी अधिकारी डी.आर.जाधव यांनी उपस्थिती राहून नागरिक व मजूरांना मार्गदर्शन केले. 
         यावेळी जिल्हाधिकारी  डॉ.नारनवरे म्हणाले की,  प्रत्येक गावाने मग्रारोहयोतील कृषी व जलसंधारणाच्या विविध वैयक्तीक लाभाच्या योजनांचा लाभ घेवून प्रत्येक कुटंबाकडे कायमस्वरुपी मत्ता निर्माण करण्यावर भर दिला. त्यांचे  कुटंबाचे जिवनमान उंचावण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.  यासाठी विविध योजनांचे एकत्रीकरण करुन त्याचा लाभ गरजू कुटंबाना देण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी यांनी प्रतिपादन केले. 
         या कार्यक्रमाअंतर्गत मग्रारोहयोची माहिती व त्या अंतर्गत घेण्यात येणारी कामे याबाबत ग्रामस्थांना  मार्गदर्शन करणे, आम आदमी विमा योजनेची माहिती देणे, मजुरांचे जॉबकार्ड काढणे, आधार कार्ड काढणे, जेष्ठ नागरीक ओळखपत्र वाटप करणे, जातीचे, उत्पन्नाचे, वयाचे रहिवाशी, इत्यादी दाखले वाटप करणे, कृषी विषयक सल्ला व मार्गदर्शन पशु आरोग्य व देखभाल विषयक मार्गदर्शन वैयक्तीक  व परिसर व स्वच्छता विषयक मार्गदर्शन, मजुरांची आरोग्य तपासणी करणे, जनावरांची आरोग्य तपासणी करणे, जिल्हापरीषद अंतर्गत विवीध योजनांचा लाभ देणे इत्यादी उपक्रम राबविण्यात आले.    
          यावेळी मजुरांना मान्यवरांच्या हस्ते आधार कार्ड,जॉबकार्ड विवीध प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास ग्रामस्थांची व मजुरांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी गावात आरोग्य तपासणी शिबीर, पशुवैधकीय  तपासणी शिबीर व आधार कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी बालाजी विष्णु पवार  या शेतक-याच्या शेतावर मग्रारोहयो अंतर्गत सिंचन विहीरीच्या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
 
Top