उस्मानाबाद ,- जिल्ह्यात वीजेपासून होणारे अपघात टाळण्यासाठी व प्रत्येक गावा-गावात तांत्रीक कर्मचारी मिळावा आणि ग्राहकांची प्रलंबित कामे होऊन त्यांना दिलासा देण्यासाठी तसेच आगामी सहा महिन्याच्या काळात उस्मानाबाद जिल्हा भारनियमन मुक्त जिल्हा करण्यासाठी जिल्ह्यातील तांत्रीक कर्मचारी यांची जिल्हास्तरावरील 195 रिक्त पद भरती प्रक्रिया डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे उर्जा,नविन व नवीकरणीय उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. 
           येथील जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात उस्मानाबाद जिल्हा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी  हे निर्देश  दिले. यावेळी आमदार मधुकरराव चव्हाण,आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार राहूल मोटे, सुजीतसिंह ठाकूर, नितीन काळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे लातूर येथील मुख्य अभियंता अनिल भोसले, महापारेषणचे मुख्य अभियंता श्री. मुंडे, अधीक्षक अभियंता अरुण पापडकर, कार्यकारी अभियंता विष्णू ढाकणे, एम.के.गुप्ता, महावितरणचे प्रकल्प संचालक प्रभाकर शिंदे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विशाल शिवतारे यांच्यासह सर्व उपविभागातील अभियंता, उप अभियंता यांची उपस्थिती होती.
        उर्जामंत्री बावनकुळे म्हणाले की, ग्राहक ही महावितरणची केंद्रबिंदू मानून त्यांची सोय करणे गरजेचे आहे. अधिकारी /कर्मचारी मुख्यालयी नसल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील बहुतांश अधिकारी/कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. त्यांचे घरभाडे तात्काळ बंद करावेत. त्यांनी तीन महिन्यापर्यंत मुख्यालयी राहणे सुरु केले नाहीत तर निलंबनाची कार्यवाही  व त्यानंतरही  मुख्यालयी न राहिल्यास कामावरुन कमी करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिले. 
             उर्जा विभागाने जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नियोजनबध्द आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यात वीज जोडणीची घरगुती, व्यापारी, औद्योगिक, पाणीपुरवठा व पथदिवे 448 कामे व कृषीपंपाची 7 हजार 150 प्रलंबित जोडण्याची कामे मार्च,2016 पर्यंत पूर्ण केल्या जातील. तसेच शेती पंप विद्युतीकरण, मराठवाडा विदर्भ कृषीपंप उर्जीकरण स्पेशल पॅकेज अंतर्गत निविदा काढणे, नादुरुस्त रोहित्र दुरुस्ती, थकबाकी, जिल्हा वार्षीक योजना व विशेष घटक योजनेती उदिष्टे, सौर कृषी पंप योजनेतून लाभार्थ्यांना पंप देणे, फीडर व्यवस्थापन योजना, पायाभूत सुविधा आराखडा, गतिमान विद्युत विकासाची उर्वरित कामांची निविदा काढून प्रलंबित कामे 26 जानेवारीपर्यंत पूर्ण करा तसेच व दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेतून जिल्ह्यासाठी 55 कोटी उपलब्ध करुन दिले आहेत. ग्राहकांना 24 तास वीज मिळण्यासाठी हा निधी खर्च केला जाईल आणि जनतेला शाश्वत वीज देण्याच्या दिशेने पावले उचलले जातील, असे आदेश आढावा घेऊन श्री.बावनकुळे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 
             सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना जिल्ह्यातील देखभाल दुरुस्ती संदर्भातील कामे थेट लॉटरी पध्दतीने देण्यात यावीत. जिल्हयातील सर्व विभागातील अपघाताचा आढावा घेऊन संबंधितांना तात्काळ रक्कमेचे वाटप करणे. प्रत्येक गावा-गावात डिसेंबरपर्यंत ट्रान्सफॉमर देखभाल दुरुस्ती भवन स्थापन करणे, ग्राहकांना वीज बील हे सरासरी वितरीत करण्यात येते हे चूकीचे असून याबाबत चौकशी करुन संबंधित एजन्सीवर तात्काळ फौजदारी स्वरुपाचे गुन्हे नोंद करणे, ग्रामपंचायत स्तरावर वीज बील भरणा केंद्राची स्थापना करण्यासाठी महावितरण कडून तात्काळ परवानगी घेणे  यापासून  ग्राहकांची बील भरण्यासाठी सोय होणार आहे, असेही श्री. बावनकुळे यांनी सांगितले.
          या जिल्ह्यात सौर उर्जेसाठी मोठा वाव असून पोषक वातावरण आहे. या भागातील वीजेची तूट भरुन नवनवीन उद्योग सुरु व्हावेत, यासाठी सौर उर्जा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहेत. याचा लाभ येथील नागरिकांना होणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमीन पवन उर्जा प्रकल्पासाठी संपादित केल्या आहेत. परंतू त्या अद्यापपर्यंत सुरु झाल्या नाहीत. त्यासाठी त्यांनी मेडा व अन्य परवानग्या घेतल्या आहेत की नाही, याची चौकशी महसूल विभागामार्फत करुन एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश श्री.बावनकुळे यांनी दिले.
           यावेळी उपस्थिती आमदारांनी आपल्या भागातील महावितरण विभागात येणाऱ्या अडी अडचणी मांडल्या. त्याचेही समर्पक उत्तरे उर्जामंत्री श्री.बावनकुळे यांनी दिली.
          या बैठकीचे सूत्रसंचलन दिलीप महामुनी यांनी केले तर आभार नितीन काळे यांनी मानले.                     
            

 
Top