उस्मानाबाद :- माहिती व जनसंपर्क विभागात कार्यरत असलेले उस्मानाबादचे लेखक शाहू पाटोळे लिखीत व जनशक्ती वाचक चळवळीने प्रकाशित केलेल्या ‘अन्न हे अपूर्ण ब्रम्ह’ या पुस्तकावर रविवार दि. 4 ऑक्‍टोबर रोजी सकाळी सरस वाचक चळवळीच्यावतीने यशश्री क्लासेसच्या सभागृहात लेखकाचे मनोगत आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. 
सुलभ, सहज भाषेत लेखनासाठी परिचित असणार्‍या तसेच माहिती व जनसंपर्क विभागात कार्यरत असणारे उस्मानाबादचे लेखक शाहू पाटोळे यांचे खाद्य संस्कृतीवर वेगळ्या धाटणीचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. ‘अन्न हे अपूर्ण ब्रम्ह’, असे या पुस्तकाचे नाव असून जनशक्ती वाचक चळवळ यांच्याकडून पुस्तक प्रकाशित झाले आहे. महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांची चर्चा प्रसारमाध्यमांतून सातत्याने घडत असते. त्या अनुषंगाने सामान्यजनांचे खाद्यजीवन मात्र चर्चेत दिसत नाही. अन्न हे पूर्ण ब्रम्ह आहे, अशी शिकवण असताना त्यास अपूर्ण ब्रम्ह का म्हणायचे, याचे विश्‍लेषण शाहू पाटोळे यांनी केले आहे. या वेगळ्या विषयाची माहिती उस्मानाबाद येथील वाचक रसिकांना व्हावी यासाठी लेखकाचे मनोगत, पुस्तकाचा परिचय आणि त्यावरील चर्चासत्राचे आयोजन सरस वाचक चळवळ उपक्रमाद्वारे करण्यात आले आहे. रविवार, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शहरातील यशश्री क्लासेसच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रकाशक श्रीकांत उमरीकर आणि सरस वाचक चळवळीचे ऍड. राज कुलकर्णी या पुस्तकाच्या आशयावर मांडणी करणार आहेत. कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन सुनील बडुरकर, रविंद्र केसकर, दौलत निपाणीकर, दयानंद माने, प्रवीण पवार, माधव इंगळे आणि रवी निंबाळकर यांनी केले आहे. 
 
Top