उस्मानाबाद - दिवस घर बांधून राहत नाही. हेही दिवस निघून जातील. खचू नका, दु:खाला घाबरून विधात्याने दिलेले सुंदर आयुष्य अजिबात संपवू नका. आमच्यासारखे हजारो भाऊ तुमच्या दु:खात सहभागी आहेत. तुम्ही एकटे नाहीत, हे सांगण्यासाठीच भाऊबीजेची भेट घेवून आपणास भेटावयाला आलो आहोत, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सदस्य शिवाजी पाडुळे यांनी केले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या 150 महिलांना भाऊबीजेच्या निमित्ताने पुणे येथील सांगवी नवरात्र उत्सव मंडळ व श्री तुळजाभवानी मित्र मंडळाच्यावतीने गोड फराळाचे साहित्य, किराणा आणि साडी भेट देण्यात आली. यावेळी रूईभर येथील जयप्रकाश विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कौटूंबिक कार्यक्रमात ते बोलत होते. शनिवारी रूईभर येथे रूईभर, बेंबळी, कनगरा, विठ्ठलवाडी, अनसुर्डा येथे 100 तर लोहारा येथे सास्तूर, माकणी, दक्षिण जेवळी, उत्तर जेवळी, बेंडकाळ व लोहारा येथील 50, अशा एकूण दीडशे गरिब, वंचित कुटूंबांना या मदतीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. आंबेडकर बालविकास संस्थेचे अध्यक्ष सुभाष कोळगे हे होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे, तुळजाभवानी मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल गीते, नागनाथ थोरात, बाळासाहेब शिंदे, किरण शिनगारे, दशरथ पाटील, विकास लोले, नितीन शिरसाळे, रोहीत चोबे, विनोद कांबळे, गोवी पाडुळे आदी उपस्थित होेते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांनी केले. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत शेकडो शेतकर्यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या कुटूंबियांसह अन्य शेतमजूर, गरीब, वंचित कुटूंबिय हालाखीचे जीवन जगत आहेत. ही बाब लक्षात घेवून गरजवंतांच्या मदतीसाठी धावून आलेल्या दोन्ही मंडळांचे आभार व्यक्त केले. यावेळी राहुल गीते, सुभाष कोळगे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून दुष्काळग्रस्तांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दोन्ही मंडळाचे सदस्य व जयप्रकाश विद्यालयातील कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.