उस्मानाबाद -: जिल्ह्यातील शेतक-यांच्या प्रमुख समस्यांपैकी आजारीपणा ही समस्या आहे. माझ्याकडे सार्वजनिक आरोग्य व पालकमंत्री ही दुहेरी जबाबदारी असून जिल्ह्यातील शेतक-यांच्या व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन विविध आरोग्य विषयक योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ रुग्णांना मिळावा. तसेच रुग्णांच्या समस्या सोडविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने पुढाकार घेण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी वैद्यकीय अधिका-यांच्या बैठकीत दिले.  
          येथील जिल्हा रुग्णालयात नुकतीच त्यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी वरील निर्देश दिले. या बैठकीला  आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, आरोग्य संचालक डॉ.सतिष पवार, अतिरिक्त संचालक डॉ.अर्चना पाटील, सहायक संचालक डॉ.साधना तायडे, उपसंचालक आरोग्य सेवा, डॉ.व्ही.एम.कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए.ई.रायते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकृष्ण पवार यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची  उपस्थिती होती. 
            या आढावा बैठकीत डॉ.सावंत म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात येत आहे. प्रेरणातंर्गत त्यांना समुपदेशन करण्यासाठी गावागावात प्रशिक्षणाचे आयोजन करावे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आचारसंहितेचे पालन करावे. गावपातळी ते जिल्हा रुग्णालयापर्यंत यंत्रणा सक्षम करावी. सर्व दवाखन्यात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करुन घ्यावा. रुग्णांना सन्मानपूर्वक वागणूक देणे, भ्रष्टाचार मुक्त आरोग्य सेवा करणे, रुग्णांची खाजगी तपासणी न करणे,  दवाखण्यात आलेल्या तात्काळ उपचार करणे आवश्यकता असेल तरच रुग्णांना रेफर करणे, रेफरलच्या प्रत्येक रुग्णांचे ऑडीट करणे, पुढील काळात आरोग्य सेवेत मोठया प्रमाणात रिक्त जागांसाठी भरती होणार असून ती पारदर्शक व्हावी.  प्रत्येक अधिकारी /कर्मचारी  व रुग्ण यांच्यामध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. उस्मानाबाद जिल्हा आरोग्य सेवा महाराष्ट्रासाठी एक आदर्श होईल या दृष्टीने कामकाज करणे अत्यावश्यक असल्याचेही ते म्हणाले.  बैठकीचे प्रास्ताविक डॉ.अर्चना पाटील यांनी केले तर आभार डॉ.माले यांनी मानले.     
 
Top