मुंबई -: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री निर्मला सितारामन् यांनी संवेष्ठन तंत्रज्ञानात आधुनिक बदल आणल्यास निर्यात क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल, असे सांगितले. त्या आज शनिवार दि. 6 नोव्हेंबर रोजी भारतीय संवेष्ठन संस्था (आयआयपी) येथे वार्षिक पदवीदान समारंभात बोलत होत्या. सितारामन् यांनी संवेष्ठन हा फक्त व्यवसाय नसून एक कला, विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे, असे सांगितले. त्यांनी आर्थिक विकासामाध्ये पॅकेजिंगची भूमिका विशद केली.
मंत्री पुढे म्हणाल्या की, आशिया ही सर्वात 41 टक्के वाट्यासह मोठी संवेष्ठन सामुग्रीची बाजारपेठ आहे. जेव्हा की, युरोप 22 आणि अमेरिकेचा वाटा 21 टक्के आहे. हे क्षेत्र पदवीधर विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी मिळवून देणारे आहे, असे त्या म्हणाल्या. आय.आय. पी यांनी संवेष्ठन क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या असून त्यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना विनंती केली की, या क्षेत्रात नाविन्यतेने नवीन संवेष्ठन उत्पादने बाजारात आणण्याची सुरुवात करावी. त्यांनी सरकारतर्फे आणि नवीनतम उत्पादनावर तंत्रज्ञानात्मक पाठिंबा असल्याचे सांगत सामुहिक विद्यार्थ्यांना उपक्रम सुरू करण्याचा सल्ला दिला. पंतप्रधानांनी याआधी अशा प्रकारच्या उपक्रमांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे.
सितारामन् पुढे म्हणाले की, सर्वच उत्पादनांना संवेष्ठन आवश्यक असून आपण टाकावू संवेष्ठनावर विचार करत नाही. जे पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. त्यांनी मानवनिर्मित फायबर संवेष्ठनाऐवजी ज्यूट संवेष्ठनाच्या उपयोगीतेवर जोर दिला. सितारामन् यांनी सांगितले की, त्यांचे मंत्रालय भारतीय संवेष्ठन संस्थेला राष्ट्रीय दर्जा देण्याच्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करत आहे. त्यांनी आयआयपी सुवर्ण महोत्सव वर्ष साजरा करत असून ही संस्था कुशल मनुष्यबळ या क्षेत्राला मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावत असल्याचे सांगितले.
वाणिज्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव रजनी रंजन रश्मी, होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे व्हाईस चान्सलर डॉ. आर.बी.ग्रोव्हर या कार्यक्रमाला उपस्थित होते. आयआयपीचे संचालक एन.सी.साहा यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
पार्श्वभूमी
भारतीय संवेष्ठन संस्था ही 1966 पासून वाणिज्य मंत्रालयांतर्गत काम करणारी स्वायत्त संस्था असून या संस्थेचा मूळ उद्देश निर्यात बाजारपेठेला प्रोत्साहन देणे आणि विविध नवीनतम संवेष्ठनाचा विकास करणे तसेच संवेष्ठन उद्योगांना प्रमाणक दर्जा संपादन करण्यासाठी प्रयत्न करणे. ही संस्था दोन वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम राबवत असून मुंबई, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद येथे संवेष्ठन संस्थेच्या शाखा आहे. भारतीय संवेष्ठन संस्था ही जागतिक संवेष्ठन उद्योगाच्या 5 ते 6 टक्के वृध्दी दराच्या तुलनेत दरवर्षी 15 टक्के या दराने विकसित होत आहे.