पांगरी (गणेश गोडसे) :- समाजासाठी करण्यासारखे खूप कांही आहे फक्त ते करण्याची जिद्द मनात असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रा.विशाल गरड यांनी केले.ते घाणेगांव ता.बार्शी येथे "समाजकारण एक करिअर" या विषयावर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. गावातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याच्या निमीत्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गावातील हनुमान मंदिरासमोर पणत्यांच्या लख्ख प्रकाशात, पाडव्याच्या मुहुर्तावर विचार पेरणी झाली. नुकत्याच निवडणुका पार पडल्याने गावातील दुभंगलेल्या मनांना विचारांच्या धाग्यांनी शिवण्याचं काम प्रा.गरड यांनी केली. तसेच सध्याचा ट्रेन्ड हा मुलांनी डाॅक्टर, इंजीनीअर, अधिकारी होण्याचा आहे अर्थात हि चांगली करिअर आहेत परंतु याच्या व्यतीरीक्तही समाजसेवक, वक्ता, चित्रकार, कवी, लेखक, पत्रकार, अभिनेता, गायक, दिग्दर्शक, हि सुद्धा समाजात प्रचंड मान सन्मान प्राप्त करून देणारी करीअर्स आहेत.प्रत्येक युवकाने अभ्यासासोबतच त्यांच्या आत दडलेल्या नाविण्यपुर्ण कलेचा शोध घेतला पाहीजे. स्वतःच्या नावासोबतच गावाचा नावलौकीक वाढवला पाहीजे. गावच्या विकासासाठी तात्पुरतं राजकारण करून अखंड समाजसेवेची जोपासना केली पाहीजे. घाणेगांव हे दारूबंदी केलेलं गांव असल्याने इथे व्यसनाधिनतेवर बोलण्यापेक्षा तुमच्या गावचं उदाहरण मी दुसऱ्या गावामध्ये देईन. गावातील तरूणांनी एकत्र येऊन दारूबंदी करून गावची व माता भगीनींची खुप मोठी समाजसेवा केली आहे. असे अनेक विचार 'समाजसेवा एक करिअर' या विषयावर चिंतन करत असताना प्रा.विशाल गरड यांनी मांडले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आनंद काशीद,रणजीत पाटील, घाणेगावचे समाजसेवक पद्माकर चवरे गुरूजी, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अमोल नवले, पत्रकार प्रविण डोके, प्रा.संभाजीराव बचुटे, प्रा.हनुमंत जाधव यांच्यासह गावातील युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रणजीत पाटील यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हनुमान तालीम संघाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.