मुंबई : चांगल्या प्रतीची तूरडाळ बाजारात रास्त दरामध्ये आठ दिवसांत उपलब्ध होईल, अशी हमी राज्य सरकारने देऊन पंधरवडा उलटला तरी देखील बाजारात चांगली तूरडाळ अजूनही १८० ते २०० रुपये प्रतिकिलोच्या दरानेच विक्री केली जात आहे. सरकारने आश्वासन पाळले नसल्याने जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे. 
साठेबाजीतून मुक्त केलेली डाळ बाजारात लागलीच उपलब्ध होईल आणि १२० रुपये किलो दराने मिळेल, अशी हमी राज्य सरकारने दिली होती. ही डाळ ग्राहकांसाठी खुली न करणा-या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानंतर व्यापा-यांनी दोन तीन दिवस १५० ते १६० रुपये किलोपर्यंत दर उतरविले होते. मात्र दिवाळी उलटून गेल्यावर तूरडाळीचे दर पुन्हा वाढले आहेत. १८० ते २०० रुपये दराची डाळ परवडत नसेल तर जनता डाळीचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र चकचकीत आणि न शिजणारी वातड अशी ही तूरडाळ घशाखाली उतर नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. त्याशिवाय लांग डाळ, तेलडाळ, वाटाणामिक्स डाळीच्या किंमती ७० ते १०० रुपयांच्या घरात आहेत. मात्र या डाळी आरोग्यास अपायकारक ठरू शकतात. त्यामुळे मुंबई ग्राहक पंचायतीने त्यांचे नमूने अन्न आणि औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी पाठविले आहेत.
 
Top