उस्मानाबाद -: 30 व्या औरंगाबाद परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा-2015 स्पर्धेस जिल्हा अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांच्या  हस्ते ध्वजारोहण व क्रीडा ज्योत प्रज्वलीत करुन येथील कवायत मैदान, पोलीस मुख्यालय येथे प्रारंभ झाला. त्यावेळी  औरंगाबाद परिक्षेत्रातून आलेल्या पुरुष व महिला खेळाडूंनी  अतिथींना मानवंदना दिली.  
यावेळी अपर पोलीस अधीक्षक डॉ.दिपाली धाटे-घाडगे, पोलीस उप अधिक्षक (गृह) अरुण सोंडे, पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी /कर्मचारी यांच्यासह खेळाडू व नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती  होती. 
यावेळी श्री.त्रिमुखे उदघाटन भाषणात म्हणाले की, क्रीडा स्पर्धा  हया कठीण परिश्रमाची असते हे खेळाडू दाखवून देतात. त्या सर्व खेळाडूंना माझ्या शुभेच्छा. स्पर्धा शातंतामय वातावरणात होण्यासाठी पंचांनी दिलेला निर्णय तात्काळ स्विकारुन खेळाडूवृत्तीचे दर्शन घडवावे,असेही आवाहन त्यांनी यावेळी  केले.
डॉ.घाडगे प्रास्ताविकात म्हणाल्या की, पोलीस विभागातील अधिकारी /कर्मचाऱ्यांना खेळाच्या माध्यमातून तणावमुक्तीसाठी अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धा आयोजनाचा मान उस्मानाबाद जिल्ह्याला मिळाला ही आनंदाची बाब आहे. खेळाडूंनी खिलाडू वृत्तीने जय -पराजय स्विकारावा. या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी विजय संपादन करुन  राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवावा आणि जिल्ह्यांस नाव लौकीक प्राप्त करुन द्यावा.   
स्पर्धेच्या प्रारंभी आरएसआयचे कॅप्टन प्रशांत सुगरवार यांनी सर्व खेळाडूंना शपथ दिली. तर जालन्याचे अखिल पटेल यांनी क्रीडा ज्योत मैदानावर घेऊन आल्यानंतर पोलीस अधीक्षक श्री.त्रिमुखे यांच्या हस्ते ती प्रज्वलीत करण्यात आली.  
या क्रीडा स्पर्धेत औरंगाबाद शहर, बीड,जालना, औरंगाबाद ग्रामीण आणि उस्मानाबाद या पाच संघानी संचलन करुन मानवंदना दिली. मार्च पास परेड साठी औरंगाबाद शहर या जिल्ह्यातून सविता पवार,बीड-अश्विनी शिंदे, जालना-सारिका राठोड,औरंगाबाद ग्रामीण-मनिषा घुले तर उस्मानाबाद येथून एस.एस.गिरी या पोलीस कॉन्सटेबलने झेंडा  दाखवून मानवंदना व संचलन केले. या स्पर्धेत विभागातील एकूण 457 पोलीस क्रीडापटूंनी सहभाग नोंदविला आहे. 
या स्पर्धेचे सूत्रसंचलन अंबादास दानवे यांनी केले तर आभार अरुण सोंडे यांनी मानले. 

 
Top