उस्मानाबाद :- भ्रष्टाचारमुक्त शासन आणि प्रशासनासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने संपूर्ण राज्यात कार्यसंस्कृती अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी राजपत्रित अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. महासंघाचे राज्य सरचिटणीस समीर भाटकर आणि राज्य संघटक मधुकर डोईफोडे यांनी या कार्यशाळेस मार्गदर्शन केले. महासंघाच्या वतीने राज्यभर पगारात भागवा अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानामुळे अधिकाऱ्यांची सकारात्मक प्रतिमा राज्यभर तयार झाली आहे. या अभियानास सगळ्यांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात ही कार्यशाळा झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी उद्धव घुगे, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, श्रीरंग तांबे, उप विभागीय अधिकारी तेजस चव्हाण, कोषागार अधिकारी विशाल पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, डॉ. शीतलकुमार मुकणे यांच्यासह विविध विभागांचे राजपत्रित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. भाटकर म्हणाले की, बहुसंख्य अधिकारी हे कार्यालयीन कामकाज त्परतेने करतात. मात्र, तरीही अधिकाऱ्यांविषयी एक नकारात्मक भावना दिसून येते. त्यामुळेच हे कार्यसंस्कृती अभियान आणि पगारात भागवा अभियान सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लोककल्याणकारी योजनांची प्रभावीरित्या अंमलबजावणी आणि प्रशासन पारदर्शक आणि लोकाभिमुख ठेवण्यासाठी सर्वच अधिकारी दक्ष आहेत, याची प्रचिती नागरिकांना होण्याच्या दृष्टीने हे अभियान उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. सहाव्या वेतन आयोगानंतर अधिकाऱ्यांना मिळणारे वेतन चांगले जीवन जगण्यासाठी पुरेसे आहे. त्यामुळे वेतन कमी असल्याची तक्रार न करता आणि मोहापासून दूर राहून अधिकाऱ्यांनी काम केले तर एक प्रकारची सकारात्मकता येईल, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
अनुचित आचरण आणि व्यवहार करताना सापडलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कधीही महासंघ पाठीशी घालणार नाही, चौकशीअंती दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद आणि तात्काळ अंमलबजावणीसाठी महासंघाचा आग्रह राहील असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
राजपत्रित अधिकारी महासंघ विविध मागण्यांसाठी कायम शासनाकडे पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाप्रमाणे 5 दिवसांचा आठवडा, सेवानिवृत्तीचे वय केंद्र आणि भारतीय प्रशासनिक सेवेप्रमाणे 60 वर्षे करणे, महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची बालसंगोपन रजा, प्रशंसनीय कामाबद्दल आगाऊ वेतनवाढी, सर्व रिक्त पदे भरण्याची आवश्यकता, अधिकाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नेमणूक, चौकशीशिवाय अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन करु नये आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांना होणाऱ्या मारहाणीसंदर्भात परिणामकारक कायदा अशा मागण्यांचाही सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरुवातीला निवासी उपजिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी श्री. भाटकर आणि श्री. डोईफोडे यांचे स्वागत केले. प्रास्ताविक कोषागार अधिकारी श्री. पवार यांनी केले. यावेळी श्री. डोईफोडे यांनीही विविध बाबींवर मार्गदर्शन केले