उस्‍मानाबाद -: जिल्‍ह्यात पाणी व चार्‍याचे दुर्भिक्ष आहे. गावात काम करित असताना आपणाला या समस्येचा रोज सामना करावा लागत आहे. समस्यांचा तोडगा म्हणून शासन विविध योजना राबवित आहे. सध्या जनतेसाठी कठिण काळ आहे. शासन पदाधिकारी, अधिकार्‍यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचण्याचा अविरत प्रयत्न करित आहे. लोक माहिती अभियान हा त्याचाच एक भाग असून दुष्काळ मुक्तीसाठी प्रशासनावतीने पंचसुत्री आखलेल्या पंचसूत्रीचे सर्वांनी पालन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केले. 
         उस्मानाबाद येथे आजपासून तीन दिवस लोक माहिती अभियानाचा जागर सुरू झाला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालय अंतर्गत असणार्‍या पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने तसेच विभिन्न विभागांच्या सहकार्याने उस्मानाबाद येथे दि. ८ ते १० डिसेंबर २०१५ दरम्यान लोक माहिती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील जि.प.कन्या प्रशालेच्या प्रांगणात आज लोक माहिती अभियानाचे उदघाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, पोलीस अधिक्षक अभिषेक त्रिमुखे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे डॉ.अब्दुल शाबन, पत्र सूचना कार्यालय मुंबईचे सहाय्यक संचालक नितीन सप्रे, सोलापूर क्षेत्रिय प्रचार कार्यालयाचे अंकुश चव्हाण उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे म्हणाले की, कठिण काळात जनतेला मदत करण्यासाठी शासनापासून ते विविध सामाजिक संघटना पुढे येत आहेत. गावातील सरपंच, ग्रामसेवक हे शासनाचे प्रतिनिधी आहेत. यासर्वांनी पंचसुत्रीचा अवलंब करावा. यात गावा-गावात जनतेला पिण्यासाठी पाणी, जनावरांना चारा, गावा-गावात रोजगार हमीचे कामे, लोकांच्या घरापर्यंत धान्य पोहचविणे, मृदजल संधारणाची जास्तीत जास्त कामे, जलयुक्त शिवार अभियान, बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून गावातील लोकांचे सर्व्हे करणे, सामुहिक विवाह सोहळा, शेतकरी गट व महिला बचत गटांना कृषि सेवा केंद्र देणे यासह अनेक महत्वपुर्ण योजना प्रशासनाने सुरू केल्या आहेत, असेही डॉ.नारनवरे म्हणाले.
       सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी गीत आणि नाट्य प्रभागाच्या तांबेश्‍वर कलापथकाने महाराष्ट्र गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने स्मृतीचिन्ह व उस्मानाबाद येथील विशेष जेरबीरा पुष्पांनी स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात चार महिला बचत गटांना कृषि सेवा केंद्राच्या परवान्यांचे वाटप करण्यात आले. उस्मानाबाद जिल्हा शासकीय रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले बोलताना म्हणाले की, सध्या आपण भारताच्या विकासाची स्वप्न पाहता आहोत. स्वतःचा विकास हा आरोग्यापासून सुरू केला पाहिजे. शासनाने आयुष्य मंत्रालयाच्या वतीने गाव पातळीवर औषध उपचार सुरू केले असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा. योग प्राणायाम हा फक्त योग दिना पुरते मर्यादिन न ठेवता आपल्या दिनचर्याचा एक भाग बनला पाहिजे. यासह विविध आरोग्य विभागाच्या योजनेची माहिती त्यांनी यावेळी दिली.
          जिल्हा पोलीस अधिक्षक अभिषेक त्रिमुखे म्हणाले की, शासनाच्या विविध योजना खास आपल्या पर्यंत पोहचविण्यासाठी व लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी लोक माहिती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
          जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते म्हणाले की, जिल्हा परिषदेमध्ये काम करित असताना जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत असे तीन स्तरावर काम करावे लागते. तळागळातील लोकांपर्यंत माहिती पोहचविणे हा आमचा मानस आहे. २०१६ च्या दैनंदिनीमध्ये या सर्व योजनाची माहिती छापाण्यात येणार आहे. जेणे करून गावा-गावात या सर्व शासकीय योजनांची माहिती पोहचले, असेही ते म्हणाले.
         अभियानाच्या उद्‌घाटनानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या जाहिरात आणि दृश्य प्रचार विभागाच्या वतीने आयेाजित ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ विषयावरील छायाचित्र प्रदर्शनाचे जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. सहाय्यक संचालक नजूंदा स्वामी यांनी प्रदर्शनाविषयी मान्यवरांना माहिती दिली.
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पत्र सूचना कार्यालयाचे सहाय्यक संचालक नितीन सप्रे म्हणाले की, भारत सरकारचे लोक माहिती अभियान हे एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. माहिती हीच शक्ती आहे. केंद्राच्या अनेक योजना असून या सर्व योजनांची माहिती घेवून जनतेने आपला विकास करून घ्यावा. तीन दिवस चालणार्‍या या अभियानात वेगवेगळया विभागाचे ५० स्टॉल लावण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.
 कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांनी तर पत्र सूचना कार्यालयाचे सहाय्यक संचालक नितीन सप्रे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास जिल्हयातील अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, महिला बचत गटाचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते. 
 
Top