उस्मानाबाद -: माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत असणार्‍या पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने तसेच जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेच्या विभिन्न विभागांच्या सहकार्याने उस्मानाबाद येथे आज जनजागरण रॅलीने लोक माहिती अभियानाला उत्साहात प्रारंभ झाला. दि. ८ ते १० डिसेंबर २०१५ दरम्यान जिल्हा परिषदेच्या कन्या प्रशालेच्या प्रागंणात उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात लोक माहिती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. क्षेत्रीय प्रचार कार्यालयातर्फे आयोजित जनजगरण रॅलीला आज सकाळी ९ वाजता उस्मानाबादचे गटविकास अधिकारी आर.व्ही.चकोर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या वेळी मुंबई पत्र सूचना कार्यालयाचे सहाय्यक संचालक नितीन सप्रे, सोलापूर क्षेत्रिय प्रचार कार्यालयाचे अंकुश चव्हाण, सतिश घोडके, कोल्हापूर क्षेत्रिय प्रचार कार्यालयाचे प्रमोद खंडागळे, एन.डी.नाळे, माध्यम समन्वयक कन्हैय्या नुनसे, गटशिक्षणाधिकारी सविता भोसले, समाज कल्याण विभागाचे श्री कदम आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
              ढोल-ताशांच्या गजरात ही रॅली जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या प्रांगणातून निघून पोस्ट ऑफीस चौक, काळा मारूती चौक, ताज महाल टॉकीज, शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळा मार्गे निघून कन्या प्रशालेच्या प्रांगणात ही रॅली विर्सजित करण्यात करण्यात आली. या रॅलीत जिल्हा परिषद कन्या शाळा, जि.प.मुलांची शाळा, शरद पवार हायस्कूल, श्रीपतराव भोसले हायस्कूल, समता माध्यमिक विद्यालय व श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे सुमारे १००० विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी रॅलीतील विद्यार्थ्यांच्या हातामध्ये बेटी बचाव-बेटी पढाव, मुला पेक्षा मुलगी बरी-प्रकाश देते दोन्ही घरी, मंत्र आहे नवयुगाचा-मुलींना हक्क प्रगतीचा, पेड लगावो-देश बचाव, स्वच्छ भारत-स्वस्थ भारत आदी घोष वाक्यांचे फलक झळकत होते. यावेळी निघालेल्या रॅलीकडे उस्मानाबाद येथील नागरिक उत्साहाने प्रतिसाद दिला. रॅलीच्या यशस्वीते करिता शिक्षण विस्तार अधिकारी मोकाशे, श्रीमती एस.आर.रणखांब, ए.एम.वीर, ए.एम.जाधव, ए.डी.माळी, पी.टी.सुर्यवंशी, माकणीकर, श्रीमती साळवे, मुंडे आदी शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले.
 
Top