उस्‍मानाबाद -: बचत गट, स्वयंसहाय्यता बचत गट, उमेद अभियान, यासह विविध शासकीय योजनेच्या माध्यमातून महिला सक्षम होत आहेत. जिल्हयात दुष्काळी परिस्थिती आहे. संकटाच्या परिस्तिीत महिला खचून जात नाहीत तर समर्थपणे सामना करतात. लोक माहिती अभियानाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा जागर सुरू असून जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रूपाली सातपुते यांनी केले.
        माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने तसेच विभिन्न विभागाच्या सहकार्याने उस्मानाबाद येथील जि.प.कन्या प्रशालेच्या प्रागंणात लोक माहिती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. अभियानाच्या दुसर्‍या दिवशी आज महिला सक्षमीकरण मेळावा घेण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी कृषि विज्ञान केंद्र तुळजापूरच्या डॉ.अनिता जिंतूरकर, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी.के.नवले, पत्र सूचना कार्यालयाचे सहाय्यक संचालक नितीन सप्रे, जिल्हा माहिती अधिकारी दिपक चव्हाण, उस्मानाबाद आकाशवाणी केंद्राचे केंद्र प्रमुख संजय बरिदे, सोलापूर क्षेत्रिय प्रचार कार्यालयाचे अंकुश चव्हाण उपस्थित होते.
         जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, स्वयंशिक्षण प्रयोग, उमेद अभियान याच्या माध्यमातून जिल्हयात महिलांसाठीचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे. या अभियानांमुळे जिल्हयातील महिलांमध्ये आत्मविश्‍वासाची वाढ झालेली आहे. हा आत्मविश्‍वास महिलांना संकटाचा सामना करण्यासाठी मदत करतो. बचत गटाने महिलांना स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे. आज जिल्हयातील महिला आत्मविश्‍वासाने उभ्या आहेत. येणार्‍या संक्रातीमध्ये विधवांना देखील हळदी-कुंकवाचा मान दिलाच पाहिजे, यासाठी जिल्हयातील महिलांनींच पुढाकार घेतला पाहिजे. तसेच येणार्‍या काळात प्रत्येक घरात शौचालय हे झालेच पाहिजे. शिवाय कुकुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसायातून महिलांनी सक्षम होण्याची गरज आहे, असे विचारही रूपाली सातपूते यांनी स्पष्टपणे मांडले.
           कार्यक्रमाच्या प्रारंभी गीत आणि नाट्य प्रभागाच्या तांबवेश्‍वर कला पथकाच्या वतीने गीतांच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. याप्रसंगी पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
         तुळजापूर कृषि विज्ञान केंद्राच्या अनिता जिंतूरकर यांनीही महिलांना सक्षम होण्याचा कानमंत्र दिला. यात कृषि पुरक विविध जोडधंद्याविषयी सविस्तर माहिती दिली. कुकुटपालन, शेळी पालन, दुग्धव्यवसाय याविषयी शासकीय योजना तसेच आशा व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम झालेल्या महिलांचे उदाहरणे देखील त्यांनी याप्रसंगी दिले. दाळ मिल, सोयाबीनवर आधारित प्रक्रिया उद्योग, दुधापासून पनिर, तुप याला असलेली मागणी याविषयी सविस्तर माहिती देवून ज्या महिला गटांना असे उद्योग सुरू करण्याची इच्छा आहे, त्यांनी तुळजापूर कृषि विज्ञान केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहनही अनिता जिंतूरकर यांनी केले.
    बेटी बचाव-बेटी पढाव या अभियानासाठी जिल्हयाची निवड झालेली आहे. ही बाब अभिमानाची नसुन जिल्हयात एक हजार मुलांच्या मागे फक्त ८६७ मुली आहेत. ही गंभीर बाब आहे. जिल्हयात आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबांतील पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेेने घेतली आहे. पुण्याला शिक्षण घेण्याची इच्छा नसले तर विविध सामाजिक संघटनेच्या वतीने वेगवेगळया ठिकाणी शिक्षणाची सोय करण्यात येत आहे तसेच विविध शासकीय योनजांची माहिती देखील याप्रसंगी महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी.के.नवले यांनी दिली. यावेळी अंबेजवळगे येथील शर्मिला कसबे, अंबेहोळ येथील पुष्पा आवड, सविता रणखांब, अर्चना माने, मनिषा रोडे, जयश्री नरवडे या विविध बचत गटांच्या महिलांनी स्वावलंबनाच्या टप्प्यावर पोहंचण्यापर्यंतचा जीवन संघर्ष उपस्थितांसमोर कथन केला. या अनुभवामुळे उपस्थितांच्या अंगावर शहारे आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्र सूचना कार्यालयाचे सहाय्यक संचालक नितीन सप्रे यांनी केले. सुत्रसंचलन रविंद्र केसकर यांनी तर जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांनी आभार मानले. या कार्यक्रमास जिल्हयातील अधिकारी, महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. उद्या गुरूवार दि. १० डिसेंबर २०१५ रोजी युवक मेळावा आणि रोजगार मेळाव्याचे या तीन दिवशीय अभियानाचा समारोप होत आहे. 
 
Top