उस्‍मानाबाद :- निसर्गाच्या अनिश्‍चिततेमुळे आपण सतत दुष्काळास सामोरे जात आहोत. यात दुष्काळाचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांना बसतो. त्यामध्ये एकतर शेती पिकत नाही व दुसरे म्हणजे दुभत्या जनावरांस हिरवा चारा उपलब्ध होत नाही. दुभत्या जनावरांसाठी हिरवा चारा अत्यंत आवश्यक असतो. कारण त्यामधून जनावरांस आवश्यक असणारे कार्बोदके, कॅल्शीयम व व्हीटॅमीन मिळत असते. त्यामुळे दुभती जनावरे चांगल्या प्रतीचे दुध जास्त प्रमाणात देत असतात. परंतू कोरडा दुष्काळ पडल्यावर करायचे काय? हा प्रश्‍न पडतो. या प्रश्‍नांचे उत्तर आता मिळाले आहे ते म्हणजे जनावरांस अधुनिक पद्धतीने बनविलेला मुरघास देणे हा होय.

 येथील जि.प. च्या कन्या प्रशालेच्या प्रांगणात लोकमाहिती अभियान सुरू असून त्याठिकाणी शासनाच्या विभिन्न विभागांचे सुमारे ५० स्टॉल्स लागलेले आहेत. यामध्ये एक स्टॉल पशुसंवर्धन विभागाचा लागला आहे. या स्टॉलवर दुभत्या जनावरांसाठी अत्यंत पोषक अशा मुरघास प्रक्रियेची माहिती या स्टॉलचे प्रमुख डॉ. शिवाजी मानकोळे हे देत आहेत. या प्रक्रियेचा उद्देश म्हणजे निकृष्ट वैरण सकस करणे हा आहे. मुरघास तयार करण्यासाठी सोयाबिन, ज्वारी, गहू, हरभरा, तुर अशा कोणत्याही धान्याचा १०० किलो भुसा त्यात ५ किलो गुळ, २ किलो युरीया, १ किलो मिठ, १ किलो मिनरल मिक्स पावडर, ४० लिटर पाणी एकत्र करून २० ते २५ दिवस त्यास मुरवायचे मग त्याला विशेष चव येते. हा मुरघास प्रोटीनयुक्त होतो. दुभती जनावरे यास आवडीने खातात आणि वैरणसुद्धा वाया जात नाही. त्यांच्यापासून मिळणारे दुध सकस व जास्त मिळते, असे त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विज्ञान केंद्रांतर्गत असणार्‍या तुळजापूर कृषी विज्ञान केंद्राच्या डॉ. अनिता जिंतूरकर यांनी अझोला व हायड्रोपोलीक्स या सकस चार्‍याच्या निर्मितीची माहिती सांगतांना सर्वप्रथम प्लास्टीकचा ट्रे घेवून त्यात दोन किलो मका कोमट पाण्यात कापडामध्ये भिजवून बांधून ठेवणे, त्यानंतर मक्याचे बी ट्रेमध्ये पसरवून देणे, त्यास झारीने किंवा चाळणीने पाणी मारून दोन आठवडे तसेच ठेवणे याद्वारे २ किलो मक्यापासून १८ ते २० किलो हिरवा चारा तयार होतो. या प्रक्रियेला मातीविना शेती असे नाव दिले असून विशेषत: उन्हाळयात जनावरांसाठी हिरवी वैरण मिळत नाही, तेव्हा ही हायड्रोपोलीक्स पद्धती अत्यंत उपयोगी ठरते. आत्मा उस्मानाबाद व कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात या प्रक्रियेचे १० प्रात्यक्षिक केले होते. व ते सर्व प्रात्याक्षिके यशस्वी झाले. त्यामुळेच त्याच्या निर्मितीचे अधिकार जिल्ह्यामध्ये दिले आहेत.
या प्रक्रियेच्या आधिक माहितीसाठी तुळजापूर कृषी विज्ञान केंद्राकडे संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. जिंतूरकर यांनी यावेळी केले. एकंदरीतच दुष्काळी परिस्थितीत मुरघास व हायड्रोपोलीक्स पद्धतीने हिरव्या वैरणीचे समस्या मिटणार असून टाकावू वैरणीपासून सकस वैरण निर्माण होणार आहे.
 
Top