उस्मानाबाद :- शेतीला पुरक असा जोडव्यवसाय म्हणून गणल्या गेलेल्या शेळी पालन व्यवसायास बरेच महत्व आले असून आता तो एक स्वतंत्र व्यवसाय झाला असल्याचे आपण पाहत आहोत. शेळी व्यवसायाद्वारे दुध व मांस मिळत असल्याने शेळी आदर्श प्राणी ठरला आहे. याचे कारण म्हणजे त्यात लागणारे कमी भांडवल व त्यातून मिळणारे किफायतशीर उत्पादन होय. म्हणूनच शेळीला गरिबाची गायसुद्धा म्हणु लागले आहे. त्याचाच प्रत्यय लोकमाहिती अभियानात येत आहे.
उस्मानाबाद येथे जि.प. च्या कन्या प्रशालेच्या प्रांगणात हे अभियान सुरू असून त्यानिमित्ताने या ठिकाणी शासनाच्या विभिन्न विभागांचे सुमारे ५० स्टॉल्स लागले असून त्यात जि.प. उस्मानाबादच्या पशुसंवर्धन विभागाचा एक स्टॉल लागला असून या स्टॉलवर कसबे तडवळे येथील धनाजी नाळे यांच्या कृषी वैभव शेळी फार्मच्या वतीने उस्मानाबादी बोकड व शेळी प्रदर्शनासाठी ठेवले असून शेळी पालनाचे महत्व व त्याचे नियोजन आदींची माहिती ते याठिकाणी देत आहेत. शेळीपालन व्यवसायाविषयी त्यांना विचारले असता, शेळीसाठी कमी जागा लागते. या व्यवसायासाठी भांडवल अत्यल्प लागते. शेळीपासून मिळणार्या मासांस मागणी जास्त असल्याने बाजारपेठ सहज उपलब्ध होते. शेळ्यांमध्ये रोगप्रतिकार शक्ती जास्त असल्यामुळे त्या काटक असतात म्हणून मृत्युचे प्रमाण कमी असते. शेळी एका वेळेस २ ते ३ पिल्ले देते. त्यामुळे संख्या झपाट्याने वाढते, असे त्यांनी सांंगितले. उत्तम मासांसाठी उस्मानाबादी शेळी किफायतशीर आहेत, हे सांगतांना शेळ्यांना अंजन, गुंज, बाभूळ, सुबाभूळ, पिंपळ बेल, कडुनिंब, उंबर, बोर, मलबंरी आदी झाडांचा पाला हा उत्तम आहार असून मृत्युदर टाळण्यासाठी शेळ्यांना दर तीन महिन्यांनी जंतनाशक द्यावे व पशुवैद्यकीयकाच्या सल्ल्याने दरवर्षी शेळीला आंत्रविषार, घटसर्प, देवी रोगाची लस टोचून घ्यावी व पी.पी.आर. रोगाची लस तीन वर्षातून एकदा टोचून घ्यावी, असे सांगितले. या स्टॉलवर यावेळी तडवळे फार्मच्या ५० किलो वजनाच्या व १३ महिने वयाच्या बोकडाचे तसेच ३५ किलो वजनाच्या व १४ महिने वयाच्या शेळीचे प्रदर्शन ठेवले असून व्यवसायासाठी माहिती घेणार्याचे लक्ष याकडे वेधले जात आहे.
त्याचप्रमाणे कडकनाथ या जातीच्या कोंबडीपालन व्यवसायाबद्दलही या स्टॉलवर माहिती मिळत आहे. हा व्यवसाय सुद्धा अत्यंत किफायतशीर असल्याचे डॉ. मानकोळे यांनी यावेळी सांगितले. कडकनाथ कोंबडीचे वैशिष्ट म्हणजे तिच्या मासांत कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अत्यंत कमी असते, तर शुगर, कॅन्सर, बीपी पेशंटसाठी हे मांस अत्यंत गुणकारी सिद्ध ठरले आहे. एका कोंबडीचे वजन २ ते ३ किलोपर्यंत होते व मासांला ४०० रूपये प्रति किलो तर अंडे ४० रूपये दराने विकल्या जाते. या कोंबडीचा रंग काळा, मांस काळे, रक्त काळे आणि अंड्यांचा रंगही काळा असतो. रोगप्रतिकारशक्ती अत्यंत उच्च असह्याने रोगांमुळे होणार्या मृत्युचे प्रमाण अत्यंत कमी असते. एकंदरीत कडकनाथ कोंबडीचे पालन एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून केल्यास आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले