उस्मानाबाद -: शहरात नगरपालिकेच्या मालकीच्या अनेक ठिकाणी खुल्या जागा आहेत. बहुतांश जागांवर अतिक्रमण करण्यात आलेले आहे. हे अतिक्रमण हटवून त्या जागा ताब्यात घेण्याची मोहीम पालिकेने सुरू केली आहे. या मोहिमेचा प्रारंभ महात्मा गांधी नगर येथील खुल्या जागेवर नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला.
महात्मा गांधी नगर येथील सर्वे 165/3 मधील खुल्या जागेचे बेकायदेशीररित्या खरेदीखत करण्यात आले होते. याबाबत नगरपालिकेत तक्रार दिल्यानंतर नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी तकडाफडकी जागेवरील अतिक्रमण दूर करून स्थानिक नागरिकांच्या मदतीने वृक्षारोपण केले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार, मराठवाडा साहित्य परिषदेेचे अध्यक्ष नितीन तावडे, पत्रकार सुहास सरदेशमुख, गोपाळ व्यास, पी. एम. गवार, माधव इंगळे यांच्यासह सुजित ओव्हाळ, नाना गाटगे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
शहरातील खुल्या ज्या खुल्या जागांवर अतिक्रमण करण्यात आले आहे, तेथील नागरिकांनी पालिका प्रशासनाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी केले आहे. तसेच पालिकेच्या मालकीच्या शहरातील सर्व जागांवर फलक लावण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी पालिका प्रशासनाला केली.