नळदुर्ग : प्रशासनाने पक्की घरे पाडल्याने अनेकांचा संसार उघडयावर पडले असून बेघर कुटूंबियांचे त्वरीत पुनर्वसन करण्याच्या प्रमुख मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने नळदुर्ग नगरपालिकेवर सोमवार दि. 18 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता “रोजगार व निवारा हक्क” मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 

नळदुर्ग नगरपरिषदेने शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम राबवून पन्नास वर्षापासून अधिक काळ बौध्दनगर सर्व्हे नं. 29 मधील शासकीय जागेवर वास्तव्य करुन राहणा-या बंजारा (लमाण), मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजातील अनेक कुटुंबाची घरे पाडून त्यांना बेघर केले आहे. तसेच शहरातील लहान-मोठे व्यावसायिकांचे दुकाने पाडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ही निषेधार्थ बाब असून रोजगार व निवारा हा माणसांचा मानवी हक्क आहे. बेघर कुटुंबियांचे व बेरोजगार व्यापा-यांचे त्वरित पुनर्वसन करावे, बेघर झालेल्या सर्व कुटुंबियांना नगरपालिका प्रशासनाने तात्काळ पिण्याचे पाणी, वीज व तात्पुरता निवा-याची सोय करावी, दि. 4 एप्रिल 2002 व दि. 9 डिसेंबर 2015 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार बौध्दनगर, शिवकरवाडी व इंदिरानगर येथील शासकीय जागेवर अतिक्रमण करुन वास्तव्य करणा-या कुटूंबियांचे अतिक्रमण कायम करुन मालकी हक्क व इतर सोयीसुविधा पुरवावे या व इतर मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन रिपाइंच्यावतीने करण्यात आले असून या महामोर्चास बेघर कुटुंबियांनी व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, राज्य सचिव संजय बनसोडे, मराठवाडा विभाग उपाध्यक्ष आनंद पांडागळे, जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे, तुळजापूर तालुकाध्यक्ष एस.के. गायकवाड, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष अरुण लोखंडे, नळदुर्ग शहराध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, उपशहराध्यक्ष दत्ता बनसोडे, तुळजापूर शहराध्यक्ष अरुण कदम आदींनी केले आहे.
 
Top