नळदुर्ग : शहरातील अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली तीन दशकापूर्वीपासून वास्तव्य करुन राहणा-या शेकडो गोरगरीबांची घरे नगरपालिका प्रशासनाने जेसीबीने भुईसपाट केले असून याप्रकरणी पालिकेच्या मुख्याधिका-यावर कारवाई करावी व बेघर झालेल्या कुटूंबियांचे पुनर्वसन करण्याची मागणी ताज सोशल सामाजिक संस्थेच्यावतीने उस्मानाबाद जिल्हाधिका-यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे तीस वर्षापूर्वीपासून राहणा-या गोरगरीब लोकांची जवळपास तीनशे ते चारशे घरे दि. 28, 29 व 30 डिसेंबर 2015 रोजी पाडून नगरपरिषदेने अल्पसंख्यांक व दलित आणि मागासवर्गीय लोकांना बेघर केले. रस्त्यावरील अतिक्रमण काढताना अतिक्रमण हटाव मोहिमेखाली कसलीही सूचना न देता अक्कलकोट रोड, किल्ला गेट, नानीमाँ दर्गाह येथील घरे जेसीबीने पाडून उध्वस्त केले. यामध्ये अनेक घरे डीआरडी यादीमध्ये असलेले आहेत. त्यांचे हातावर पोट असून सध्या दुष्काळामध्ये उस्मानाबाद जिल्हा होरपळत आहे. एकीकडे पिण्यास पाणी नाही. हाताला काम नाही. शेतक-यासह शेतमजूर देशोधडीला लागले तर मोठयाप्रमाणावर शेतकरी कर्जबाजारीपणामुळे सध्या आत्महत्या करीत आहे. मोठयाप्रमाणावर पुणे, मुंबईकडे कामाच्या शोधात गरीब लोक भटकत असताना नगरपरिषदेच्या मुख्याधिका-यांनी कसलीही खातरजमा न करता, लोकांचे म्हणणे न ऐकता मनमानीपणे जेसीबीने घरे पाडून अन्यायाचा कहर केला आहे.

बेघर झालेले अनेकजण किल्ल्याच्या बाहेरील खंदकात आणि शहराबाहेर डोंगर माळरानावर उघडयावर ऐन थंडीत आपला संसार करीत आहे. आजपर्यंत बेघरांची एकाही राजकीय पुढा-यांनी व सरकारी अधिका-याने भेट देवून साधी विचारपूस केली नाही. बेघरांना पिण्याचे पाणी, लाईट अशी कसलीही सोय नाही. शाळेला जाणा-या विदयार्थ्यांचे मोठे हाल होत आहे. अतिक्रमणावेळी भेट देणा-या उपविभागीय अधिका-यांना बेघरांची व्यथा सांगितली असता त्यांनी तोंडी पाणी, वीज व इतर सोयी बेघरांना पुरविण्याचे संबंधित अधिका-यांनी दिले होते. मात्र बेघर लोकांची मोठी हालअपेष्टा होत आहे.

नळदुर्ग नगरपरिषदेने शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम राबवून अनेक छोटी-मोठी दुकाने पाडली. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. त्यांच्या हाताला काम नाही. सध्या त्यांची उपासमार होत असून आमच्या अर्जाचा सहानुभूतीने विचार करुन बेघर झालेल्यांचे घरे बांधून पुनर्वसन करावे, त्यांना मालकी हक्क देवून पाणी, वीज, शौचालय यासारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दयावे, तसेच बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून दयावे, अतिक्रमण हटाव मोहिमेत गोरगरीबांवर अन्याय करणा-या व श्रीमंतांना अभय देणा-या मुख्याधिका-याची कसून चौकशी करुन कडक कारवाई करावी व बेरोजगार झालेल्या आणि बेघरांना न्याय दयावे, अन्यथा सर्व धर्मियांच्यावतीने न्याय मागण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ताज सोशल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मन्सुर शेख यांनी दिला आहे. निवेदनाची एक प्रत माहितीस्तव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री एकनाथ खडसे, विभागीय आयुक्त औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधिक्षक, तुळजापूर तहसिलदार, आमदार मधुकरराव चव्हाण, पालकमंत्री ना. दिपक सावंत, अल्पसंख्यांक आयोग यांच्यासह संबंधितांना पाठविण्यात आले आहे.
 
Top