नळदुर्ग -: येथील अक्कलकोट रोडलगत असलेल्या बौध्दनगरच्या सर्वे नं. 29 मधील मागासवर्गीयांचे 50 वर्षापूर्वीची राहती घरे नगरपालिका प्रशासनाने पूर्व सुचना न देता जे.सी.बी ने उध्वस्त्‍ करून अनेकांना बेघर केल्याप्रकरणी शासनाने तात्काळ बेघर कुटुंबियाचे पुर्नवसन करावे. या मागणीसाठी व प्रशासनाच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बंजारा गोर सेनेच्यावतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना बुधवार रोजी निवेदनाद्वारे दिले आहे. 
   नळदुर्ग नगर पालिकेने दि. 28 ते 30 डिसेंबर दरम्यान अतिक्रमण मोहिमेतंर्गत  रस्त्यावरील अतिक्रमण काढत असाताना जिथे कशाचाही अडथळा नसणा-या सर्वे नं. 29 मधील बंजारा (लमाण) व दलित, मुस्लिम समाजाची घरे एकाच वेळी तीन ते चार जे.सी.बी ने अत्यंत निदर्यीपणे भुईसपाट केली.  त्यामुळे ऐन दुष्काळात व थंडी मध्ये अनेकांना बेघर व्हावे लागले. त्यापैकी अनेक कुटुंबिये शहराबाहेर उघड्या-बोडक्या डोंगर माळरानावर संसार उपयोगी साहित्य घेवून आसरा घेतला आहे. बेघर कुटुंबियाचे घरे पाडण्यापूर्वी त्यांना नोटीस दिली नाही. प्रशासनाने मनमानीपणे अचानक या वस्तीवर तीन ते चार जे.सी.बी ने हल्ला बोल करून गरिबांची घरे उद्वस्त्‍ केली. प्रशासनाने तात्काळ बेघर कुटुंबियाचे कायम स्वरूपी पुर्नवसन करावे. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर  धरणे आंदोलन, रास्ता रोको, अमरण उपोषण या लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा न्याय हक्क अधिकार आणि मान सन्मानासाठी समर्पित गोरसिकवाडी पुरस्कृत  बंजारा गोरसेनेच्या उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ पवार, जिल्हा सचिव बालाजी राठोड यांनी जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिले आहे.
 
Top