नळदुर्ग ता. तुळजापूर येथील नगरपालिका प्रशासनाचा गेल्या अनेक दिवसापासून
नंगानाच सुरू असून लोकप्रतिनिधी मुग गिळून गप्प आहेत त्यामुळे येथील न.प. चा कारभार
“अंधेरी नगरी चौकट राजा” याप्रमाणे असून शहरवासियातून तीव्र संताप व्यक्त केला जात
आहे. गेल्या काही महिन्यापासून नळदुर्ग नगरपालिका
विविध कारणावरुन गाजतअसून प्रशासनाच्या गैरकारभाराचे पुरतेधिंडवडे निघाले आहे. “जन
सेवा हिच ईश सेवा” हे बीद्र घेवून मिरवणा-या
न.प. प्रशासन व लोकप्रतिनिधीना याचा विसर पडल्याचे अनेक नाटयमयरित्या घडणा-या घडामोडीवरुन
स्पष्ट होत आहे.
नळदुर्ग
येथील सर्वसामान्यांसाठी शासनाने मंजूर केलेली घरकुल योजनेत घोटाळा झाला. त्यामुळे
अनेकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन न्याय मागितले आहे. घनकचरा कामाच्या ई-निविदा
गैरप्रकरण, शहरातील विकास कामे अनेक वर्षापासून अर्धवट अवस्थेत असल्याने विकासाचे तीन
तेरा झाले, कोटयावधीचा निधी न.प. कडे पडून असताना विकास कामाबाबत प्रशासनाचे जाणीवपूर्वक
दुर्लक्ष, पदाधिका-यांना विशेषत: महिला सदस्याला मुख्याधिका-यांकडून हिनतेची वागणूक,
काम न करताच संबंधित ठेकेदाराना कामाचे बील देणे, मुख्याधिका-यांविरुध्द वारंवार सदस्यासह
अनेकांनी वेळोवेळी जिल्हाधिका-याकडे गंभीर तक्रार करुनही, प्रसंगी नगरसेवक, पत्रकारानी
उपोषण करुनही जिल्हा प्रशासनाने दखल न घेणे, जिल्हा न्यायालयासह उच्च न्यायालयात न.प.
प्रशासनाविरुध्द अनेक प्रकरणे न्याय प्रविष्ठ आहे. न.प. च्या अनागोंदी कारभाराबाबत
राज्याच्या मुख्यमंत्र्रयासह विभागीय आयुक्त औरंगाबाद, पंतप्रधान कार्यालयापर्यंत संबंधित
प्रकरण गेले आदी व इतर अनेक गैरप्रकारामुळे नळदुर्ग नगरपालिका प्रशासन गाजत असल्याने
सर्वत्र चर्चेचा मोठा विषय झाला आहे.नळदुर्ग नगरपालिकेवर काँग्रेस पक्षाची सत्ता असून
काँग्रेस पक्षाचे 9, राष्ट्रवादीचे 7 व शिवसेनेचे एक तर काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचे
प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य असे मिळून 19 न.प. सदस्यांची पक्षीय बलाबल संख्या आहे.
दरम्यान, या नगरपालिकेस आगामी सहा महिन्यानंतर निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधक सदस्यांना शहर विकासाबाबत काय केले? की गावची
स्मशानभूमी केली? याबाबत मतदान मागायला गेल्यावर जनतेला उत्तरे देण्यासाठी मोठी कसरत
करावी लागणार आहे. नगरपालिकेच्या गलथान कारभाराने त्रस्त झालेल्या अनेकांनी यापूर्वी
तुळजापूर,उस्मानाबाद येथील न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे अनेक
प्रकरणे दाखल केले आहेत. ते न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. शहरामध्ये शासकीय भूखंड धनदांडग्यानी
बळकावल्याप्रकरणी नळदुर्ग नगरपालिकेच्यावतीनेही अनेक प्रकरण न्यायालयात दाखल आहेत.
परंतू न.प. प्रशासन पाठपुरावा म्हणावे तसे करत नसल्याने अनेकांचे फावले जात आहे. काही
नगरसेवकांचे संबंधिताशी हित संबंध असल्याने न.प. च्या वकीलास किंवा कर्मचा-यास न्यायालयात
हजर होवू देत नसल्याने आतापर्यंतचे अनेक निकाल एकतर्फी लागल्याची चर्चा शहरवासियात
होत आहे. शहरातील बेकायदेशीर भूखंडाची न.प. दप्तरी नोंद तत्कालीन मुख्याधिका-याने मनमानीपणे
घेतल्याचे समजताच अनेकानी तत्कालीन जिल्हाधिकारी डी.आर. बनसोड यांच्याकडे तक्रार करुन
घेतलेल्या नोंदी रदृ केल्याचे सर्वश्रूत आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये न.प. प्रशासनाच्या
भ्रष्ट कारभाराविरोधात नगरसेवकांनी पुढाकार घेवून आवाज उठविला होता. त्यावेळी न.प.
मध्ये होत असलेल्या नियमबाहय कामाची व भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची
मागणी जिल्हाधिका-यांकडे केली होती. तर काँग्रेस पक्षश्रेष्ठी काही मोजक्याच नगरसेवकाच्या
फेवरमध्ये असल्याने न.प. मध्ये गैरप्रकाराने उच्चांक गाठल्याने न.प. च्या कारभारात
सुधारणा व्हावी म्हणून अनेकांनी आंदोलन करुन हस्तक्षेप केला होता. संबंधित अधिका-याने
काही नगरसेवकांना हाताशी धरुन मनमानी व नियमबाहय अनागोंदी कारभारामुळे न.प. चे आर्थिक
नुकसान होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिका-यांकडे केल्या होत्या. नियमबाहय व बेकायदेशीर
असलेले ठराव इतिवृत्त नोंदवहीमध्ये लिहिण्यात आले होते. त्यामुळेच आपण दि. 26 मे
2015 रोजी झालेल्या सर्वधारण सभेच्या इतिवृत्त नोंदवहीमध्ये स्वाक्षरी केली नसल्याचे
सदरील नियमबाहय व बेकायदेशीर ठराव रदृ करुन दि. 26/5/15 रोजी घेतलेली सर्वसाधारण सभा
रदृ करावी, अशी लेखी मागणी त्यावेळी माजी नगराध्यक्षा तथा विदयमान काँग्रेसच्या नगरसेविका
सौ. मंगल सुरवसे यांनी जिल्हाधिका-यांकडे केली होती. त्यावरुन मनमानी कारभार करणा-या
संबंधितांचे पितळ उघडे पडले होते. याप्रकरणी आजही शहरवासियात चर्चेला उधाण आले आहे.
फोटो – नगरपालिका इमारत