नळदुर्ग : नळदुर्ग व परिसरात महिनाभर गायब असलेल्या पावसाने या आठवडयात दमदार हजेरी लावल्याने पेरणीसाठी शेतक-यांनी बैलाऐवजी ट्रॅक्टरद्वारे लगबगीने पेरणी करण्यास अधिक पसंती देत आहेत.
     शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम हा अत्यंत महत्वाचा असून सोयाबीन, मुग, उडीद, तुर, तीळ ही नगदी पिके त्याचबरोबर मटकी, हुलगा, बाजरी, साळ, कारळ ही पिके याच हंगामात येतात. तर नगदी पिकांचे भुस्कट जनावरांसाठी खाद्य उपयुक्त मानले जाते. तसेच रानोमाळ सर्वत्र गवत आल्याने जनावरांना चारा उपलब्ध होतो. हमखास हंगाम म्हणून खरिपाकडे शेतकरी वर्ग पाहतो.  
      यंदा पावसाळ्याच्या प्रांरभी पावसाने हजेरी लावून महिनाभर पावसाने दडी मारली होती. त्यातच हवामान खात्याने पावसाळा लांबल्याचे जाहीर करुन शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये अशी सूचना केल्याने  पेरण्या खोळंबल्या. नाममात्र शेतकऱ्यांनी धाडसाने पेरण्या केल्या. मात्र 75 टक्के पेरणी झालीच नाही. वरुणराजाच्या लहरीपणाने नळदुर्ग परिसरावर डोळे वटारल्याने खरीप हंगाम वाया जातो की काय? या भितीने शेतकरी धास्तावला असतानाच दिर्घ प्रतीक्षेनंतर रविवार दि. 8 जुलै रोजी झालेल्या पावसाने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या. सोमवार दिवशी शेतकरी वर्ग बैलाद्वारे शेती काम करीत नसल्याने शेती कामास सुटटी देवून मंगळवार रोजीपासुन शेतशिवारात सर्वाधिक यंत्राद्वारे पेरण्यांची लगबग शेतकरी करताना दिसून येत आहे.
        पाऊस गायब झाल्याने अनेकांनी बियाणे-खते खरेदी केली नसल्याने बाजारात शुकशुकाट जाणवत होता. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतक-यांची बियाणे व खते खरेदी करण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे. अनेकांना नामांकित कंपनीचे बियाणे खते न मिळाल्यामुळे सुट्टे बियाणे पर्याय म्हणून मिळेल त्या किमतीत खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहेकृषी विभागाच्यावतीने बियाणे धनदांडग्या शेतक-यांना वाटप करुन कृषी सहाय्यकांनी मलिदा लाटल्याची शेतक-यांतुन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. शासनाची योजना चांगली असली तरी योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचविल्या जात नसल्याने व कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने शेतक-यांवर अन्याय होत असल्याचे दिसुन येत आहे. याप्रकरणी जिल्हाधिका-यांनी नळदुर्ग कृषी मंडळ कार्यालयातील कारभाराची चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी शेतक-यांतून केली जात आहे.



 
Top