तुळजापूर :- गुरूविषयी सद्भाव व आदर व्यक्त करणारा गुरू पौर्णिमा हा दिन तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द या शाळेत संपन्न झाला. गुरू म्हणजे असा सत् चित् आनंद जो आपली खरी ओळख करून देतो. शाळेतील सातवी वर्गातील मुलांनी बालसभा या कार्यक्रमाचे संयोजन केले. गायकवाड देविदास यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात शिवाजी वेदपाठक ,अंजली निकते, मनोज पाटील व प्रशांत वैदकर हे प्रमुख पाहुणे म्हणून होते . या मंगल दिनी महर्षी व्यास यांना वंदन करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सृष्टी गिरी हिने केले. शाळेतील मुलांनी सर्व शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या .तसेच मनोगतातून जीवनातील गुरूंचे महत्त्व व पुराणातील गुरु शिष्य परंपरा याबद्दल विचार मांडले .तसेच गुरुची महती सांगणारे " गुरुगीत " संजीवनी कदम या मुलीने सादर केले तर प्रत्येकाच्या जीवनातील पहिली गुरु म्हणजे आई .आईची माया, तिचे प्रेम याचे चित्र उभा करणारे गीत कु .कदम जयश्री , .आकांक्षा कदम ,सृष्टी राज्यश्री या मुलींनी सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचे दिमाखदार सूत्रसंचालन रोहिणी नरवडे व स्नेहा कदम या विद्यार्थिनींनी केले .
यावेळी शिवाजी वेदपाठक यांनी गुरुपौर्णिमेची माहिती सांगताना पुराणातील गुरुशिष्य परंपरा, गुरूशिष्य कथा ऐकवून प्रत्येक विद्यार्थ्यांनी सर्व गुरुविषयी आदरभाव ठेवल्यास ,गुरूंची शिकवण आचरल्यास जीवनात यशस्वी होता येते असे सांगितले . अध्यक्षीय भाषणात गुरू हा परिसा सारखा असतो असे सांगून तंत्रज्ञानाच्या युगात गुरूंचे महत्त्व ,गुरूंचा आदर कमी होत असून मुलांना माहितीची इतर माध्यमे उपलब्ध असली तरी योग्य मार्गदर्शन व दिशा दाखवण्याचे सत्कार्य गुरूच करू शकतात असे सांगितले .तसेच विद्यार्थ्यांनी राजहंसाप्रमाणे वृत्ती ठेवून जे जे चांगले आहे ते ते वेचित ज्ञानरूपी जीवनातील वाटसरू असावे व या भूमिकेचे सदैव स्मरण ठेवावे अशी अपेक्षा मांडली .यावेळी श्री विठल नरवडे व पांडुरंग जावळे यांनीही विचार मांडले .
या कार्यक्रमात देविदास गायकवाड ,शिवाजी वेदपाठक , अंजली निकते , पांडुरंग जावळे ,विठ्ठल नरवडे ,माधव मोरे ,मनोज पाटील ,गुणवंत चव्हाण, बाळू मुंडे ,प्रशांत वैदकर या गुरुजनांना शुभेच्छा देण्यात आल्या .शेवटी सर्वांचे आभार नीलेश पारधे या मुलाने मानले .