काटी :-  काटी ता. तुळजापूर येथून जवळच असलेल्या बार्शी तालुक्यातील माणकोजी बोधले महाराज यांच्या धामणगावला छोटी  पंढरी म्हणून  ओळखले जाते.  आषाढी  एकादशी  ते पोर्णिमेपर्यंत  या तिर्थ क्षेत्राच्या ठिकाणी  दरवर्षी  मोठी  यात्रा  भरते.  ज्या प्रमाणे  राज्याच्या विविध  भागातून  विविध  संतांच्या  पालख्या  लाखो वारकर्‍या  सावळ्या  विठुरायाच्या दर्शनासाठी  पंढरपुरच्या दिशेने पावसापाण्याची तमा न बाळगता पायी चालत  जातात. तसेच  देहू आळंदीहून लाखो वारकरी ज्ञानोबा-तुकारामच्या नामघोषात  आपल्या  संसाराचे भान न ठेवता लाखो  भक्त  पंढरीत दाखल होऊन तासनतास  विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत  उभे राहतात.  त्याच प्रमाणे  धामणगाव येथील विठ्ठल  भक्तांनी आपले सर्वस्व मानलेल्या विठ्ठल-रुक्माई मुर्तीची प्राण प्रतिष्ठा  संतश्रेष्ठ  जगद्गुगुरु श्री तुकाराम  महाराजांच्या पुण्य हस्ते  या धामणगाव नगरीत केली. येथील  माणकोजी  बोधले महाराज हे स्वत: संत तुकाराम  व रामदास  या महासंत विभुतींना भेटले असल्याने त्यांना  प्रत्यक्ष  निवृत्तीनाथांचा अवतार  मानले जाते. बार्शीचे आमदार  दिलीप  सोपल यांनी माणकोजी  बोधले महाराज मंदिरात भेट देऊन  दर्शन घेतले.   
            दरवर्षी  बार्शी,  वैराग, काटी, सावरगाव,  तुळजापूर, जवळगाव, दहिवडी,  शेळगाव (आर) आदी पंचक्रोशीतील लाखो भाविक  या ठिकाणी  येवून  मोठ्या  भक्ती भावाने विठ्ठल-रुक्माईचे दर्शन  घेऊन  कृतज्ञ होतात.  आषाढी  एकादशीला परिसरातील  गावांमधून  पालखी दिंडी  घेऊन  हजोरों विठ्ठल  भक्त  हातात  भगवे ध्वज, टाळमृदंगाचा गजर  व मुखी हरिनामाचा  जयघोष करित धामणगावच्या दिशेने   पायी वाटचाल करतात. या पायीदिंडीत महिला,  अबालवृध्दासह तरुणांचा  सहभाग मोठ्या संख्येने  असतो.  यावर नियंत्रण  ठेवण्यासाठी  पोलीस  बंदोबस्तासह गावातील  तरुण   कार्यकर्त्याचा फौजफाटा  असतो. विठ्ठलाचा नामस्मरणात, उपासनेत, हा धामणगावचा विठ्ठल  भक्त  इतका तल्लीन  झाला की, वारकरी सांप्रदायाचे आद्यपीठ पंढरपूरची वारी आपली चुकेल  त्यांनी एकवेळ  आपल्या  शेतातील  धान्याचे खळे, शेतातील  कामकाज  तशीच  अर्धवट  टाकून पंढरपूरच्या वारीला निघून गेले.  त्यावेळी  विठ्ठल  त्यांच्या मदतीला  धावून आले.  पांडुरंगानी आपल्या  भक्तासाठी माणकोजीच्या शेतातील  खळे राखले, शेताची राखण केली, माणकोजी बोधले महाराज पंढरपूरहून परतल्यानंतर त्यांना हा  चमत्कार  पहायला  मिळाला अशी  अख्यायिका आहे. माणकोजी  बोधले महाराज यांनी दुष्काळात, उन्हा-पाऊसात भक्तांना परमार्थ  कसा करावा याची शिकवण  अभंगवाणीतून दिली आहे.  
               अशा थोर  सत्पुरुषाच्या वास्तवाने  पावन झालेल्या  धामणगाव नगरीत माणकोजी  बोधले महाराज  यांनी आपल सर्वस्व मानलेल्या विठ्ठल- रुक्माईची  प्राणप्रतिष्ठा साक्षात संतश्रेष्ठ  जगद्गुरू श्री तुकाराम  महाराजांच्या पुण्यहस्ते धामणगाव नगरीत केली.  संत तुकाराम आणि संत रामदास  या महान संत विभूतींना  प्रत्यक्षात भेटलेल्या हा संत माणकोजी  बोधले हे प्रत्यक्ष  निवृत्तीनाथाचे  अवतार  मानले जातात.  माणकोजी बोधले महाराजांच्या अभंगाचे लिखाण प्रत्यक्ष  पांडुरंगाने केले. म्हणून या नगरीला प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते.  सांप्रदायिक  व ऐतिहासिक  पार्श्वभूमीची वैभवशाली  परंपरा  असलेल्या  संतशिरोमणी श्री संत तुकाराम महाराज  आणि  संत रामदास  यांच्या  पुण्यस्पर्शाने पावन  झालेल्या  या धामणगाव नगरीचे दर्शन घेऊन पंचक्रोशीतील लाखो भाविकांना मोठा आनंद  मिळत आहे. 
 
Top