बार्शी : कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता स्थापनेसाठी निर्माण झालेला तिढा अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने सुटला आहे. बाजार समितीवर सर्वाधिक जागा जिंकणारे माजी आमदार राजेंद्र राऊत आणि भाजपचे नेते राजेंद्र मिरगणे यांनी आज नागपूर येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, यावेळी दोन्ही भाजप नेत्यांनी एकत्र येत सत्ता स्थापन करण्याची सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
             यंदा प्रथमच तालुक्यातील शेतकऱ्यांना बाजार समिती निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क मिळाला होता, यामध्ये गेली अनेक वर्ष बाजार समितीवरील आमदार दिलीप सोपल यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यात माजी आमदार राजेंद्र राऊत यांना यश आले. एकूण १८ जागांपैकी सर्वाधिक ९ जागा राऊत गटाला मिळाल्या तर आ सोपल यांच्या पॅनेलला ७ जागांवर विजय मिळवता आला. तर भाजपचेच राजेंद्र मिरगणे आणि भाऊसाहेब आंधळकर यांच्या आघाडीचे २ उमेदवार झाले होते. दरम्यान, सर्वाधिक जागा जिंकूनही सत्ता स्थापनेसाठी राऊत यांना मिरगणे गटाच्या पाठिंब्याची गरज होती.
               अवघ्या दोन जागा जिंकणाऱ्या मिरगणे - आंधळकरांच्या हातात सत्तेच्या चाव्या आल्या होत्या. पण मिरगणे गटाचे दोन्ही उमेदवार हे व्यापारी गणातून निवडून आले असल्याने तांत्रिकदृष्ट्या त्यांना कोणत्याही पदावर त्यांना दावा सांगता येत नव्हता. त्यामुळे दुसऱ्या गटाला पाठींबा देणे किवा तटस्थ राहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. दरम्यान, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने सत्ता स्थापनेचा तिढा सुटला आहे. यावेळी राऊत, मिरगणे यांच्या समवेत माजी नगराध्यक्ष विश्वास बरबोले, नूतन संचालक रावसाहेब मनगिरे उपस्थित होते.

साभार - महाराष्ट्र देशा

 
Top