![]() |
राजेंद्र निंबाळकर |
नळदुर्ग :- शासकीय जागेवर राहणा-या गरीब कुटूंबांना प्रशासकीय यंत्रणेने यापूर्वी अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांची घरे पाडून बेघर करुन मोठा अन्याय केला. शासनाच्या धोरणात्मक निर्णयाच्या विरोधी प्रशासनाने काम करुन शासनाची दिशाभूल करणा-या संबधित अधिका-यांना निलंबित करावे, गरीबांवर होणा-या अन्यायाच्या विरोधात दाद मागण्यासाठी श्रावणबाळ माता पिता सेवा संघटनेच्यावतीने औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दि. 7 सप्टेंबर रोजी महाउपोषण करण्यात येणार आहे. या महाउपोषणात मराठवाडयातील सर्व जिल्हयातून झोपडपटटीधारक सहभागी होणार आहेत.
नळदुर्गसह मराठवाडयात अनेक ठिकाणी घरे पाडण्याची अन्यायकारक कारवाई यापूर्वी करण्यात आली आहे. प्रशासकीय यंत्रणेकडून अतिक्रमणबाबतच्या 12 जुलै 2011 च्या शासन निर्णयाचा दुरुपयोग करुन गोरगरीब कुटूंबांना बेघर करणे, उच्च न्यायालयात सरकारच्या धोरणात्मक निर्णयाच्या विरोधी प्रतिज्ञापत्र दाखल करणे, शासकीय जागेवर राहत असलेल्या कुटूंबांना मालकी हक्काचा उतारा देण्याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणे, प्रधानमंत्री आवास योजनेत केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन न करणे, सरकारी जागेवर राहत असलेल्या कुटूंबांना आहे त्याच जागेवर घर देण्याचे, त्याचप्रमाणे घरासाठी जागा उपलब्ध करुन देण्याऐवजी शासनाचे नियम धाब्यावर बसवून प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अडथळा निर्माण करणे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
औरंगाबाद विभागांतर्गत येणा-या उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, लातूर, हिंगोली आदी जिल्हयातून हजारो झोपडीपटटीधारक आयोजित महा उपोषणात सहभागी होणार आहेत. मराठवाडयातील अनेक ठिकाणी दि. १२ जुलै २०११ च्या शासन निर्णयाचा गैरवापर करून पिढ्यान पिढया राहात असलेल्या गरिबांची घरे प्रशासकीय अधिका-यांनी उध्वस्त करून बेघर केले. संबंधित प्रशासकीय अधिका-यांनी शासनाच्या धोरणात्मक निर्णयाविरोधात भुमिका घेत असतील तर संबंधितांवर कारवाई करावी, याबाबत मुख्यमंत्र्यासह संबंधितांना यापूर्वी संघटनेने निवेदन दिले होते. मात्र याची दखल न घेतल्याने दि. 7 सप्टेंबर रोजी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर महाउपोषण करण्यात येत आहे.
राज्यातील विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे दि. 31 ऑगस्ट, नाशिक दि. 28 ऑगस्ट, औरंगाबाद दि. 7 सप्टेंबर, अमरावती येथे 11 सप्टेंबर तर नागपूर येथे दि. 28 सप्टेंबर रोजी महाउपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणाची दखल न घेतल्यास दि. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या दिवसापासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांनी दिला आहे.
संपर्क
राजेंद्र निंबाळकर
मो.नं. 9673771262