तुळजापूर (दास पाटील) :-
तालुक्यातील काक्रंबा ग्रामपंचायतीची सोमवार दि २० रोजी बोलवण्यात आलेली महिला ग्रामसभा एक महिला सदस्य सरपंच व ९ महिलांच्या उपस्थितीत बंद दाराआड उरकल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. सदरील ग्रामसभेची पूर्व कल्पना न देता मनमानी कारभार करून बंद दाराआड चुपचाप ग्रामसभा घेण्याच्या कृत्यावर संताप व्यक्त करत, याप्रकरणी संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी विरोधी सदस्यासह महिलावर्गातून होत आहे.
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दिपक होळकर यांनी सोमवार दि २० रोजी सकाळी १० वा. सरपंच वर्षा बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सदस्यांची मासिक बैठक बोलवलेली होती. सदरील मासिक बैठक संपताच ११.३० वा.च्या सुमारास अचानक महिला ग्रामसभेचे आयोजन केले. तत्पूर्वी सदरील ग्रामसभेची गावातील महिलांना कसलीही पूर्व कल्पना न देता महिला ग्रामसभा ऐनवेळी बोलवण्यात आली. त्यामुळे महिलांना या ग्रामसभेपासून नाहाक वंचित रहावे लागले. तसेच या ग्रामसभेत विविध प्रश्न, समस्या मांडता आल्या नाहीत. या लुटुपुटीच्या महिला ग्रामसभेला फक्त सरपंच, एक महिला सदस्यासह इतर ९ अशा एकूण ११ महिला हजर होत्या. यावेळी ग्रामसभेला हजर असलेले नरसिंग भिसे यांनी ग्रामसेवकांनी सदरील ग्रामसभेची दवंडी न देता ग्रामसभा का बोलवण्यात आली असा जाब विचारत, तुम्ही मनमानी कारभार करून महिलांना ग्रामसभेपासून वंचित ठेवले, असा आक्षेप घेत ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली. त्यानंतरही ग्रामसेवकांनी या आक्षेपास न जुमानता ११ महिलांवरच बंद खोलीत ग्रामसभा उरकून घेतली.
महिला ग्रामसभेला महिला उपसरपंचाची दांडी :
काक्रंबा ग्रामपंचायतीने बोलवलेल्या महिला ग्रामसभेला फक्त सरपंच व एक महिला सदस्या हेच उपस्थित होते. उपसरपंचासह इतर महिला सदस्य या ग्रामसभेला गैरहजर असतानाही ही सभा उरकण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात आपल्या कामानिमित आलेल्या नऊ महिलांच्या उपस्थितीत ग्रामसेवकांनी सदरील ग्रामसभा पूर्ण केल्याने इतर महिलांना केवळ ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारामुळे वंचित राहवे लागले आहे. याबाबत विरोधी सदस्यासह गावातील महिलांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच संबंधीत ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
महिला ग्रामसभेला कोरमची गरज नाही. - ग्रामसेवक दिपक होळकर
या बाबत ग्रामसेवक दिपक होळकर यांना विचारणा केली असता त्यांनी, ग्रामसभेची दवंडी देण्यासाठी माणूस मिळाला नसल्याने कर्मचाऱ्यां मार्फत महिलांना निरोप देण्यात आले होते, असे स्पष्टीकरण दिले. तसेच महिला सभेला कोरम पूर्ण होण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले.
ग्रामपंचायतचे स्पिकर माईक गेले धुळीत
शासनाने जिल्हा परिषदमार्फत ग्रामपंचायतकार्यालयाला विविध शासकिय योजनेची माहिती, जनजागृती व ग्रामसभेची माहिती देण्यासाठी दहा वर्षांपूर्वी प्रत्येक ग्रामपंचायतीला ला स्पिकर व माईक दिलेले आहेत. मात्र काक्रंबा ग्रामपंचायतीस दिलेले माईक व स्पिकर अडगळीत धुळ खात पडले आहेत. याचा वापर केल्यास ग्रामसभेची माहिती सर्वांना सहज मिळू शकते. मात्र सभेची दवंडी देण्यासाठी माणूस मिळाला नसल्याची कारण सांगून ग्रामसेवकांनी आपले हात झटकले आहेत. याबाबत ग्रामसेवकाला विचारले असता त्याची आपणास माहिती नसल्याचे म्हणाले.
ग्रामसेवकावर कार्यवाही ची मागणी
या बाबत विरोधी सदस्य मनोज घोगरे यांनी, ग्रामसेवकाने मनमानी कारभार करत महिला ग्रामसभेची गावातील महिलांना दंवडीद्वारे पूर्वकल्पना न देता मासिक सभा संपल्यावर अचानक बंद खोलीत महिला ग्रामसभा घेतली आहे. आपण या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.