उस्मानाबाद :- ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्या जोरावर जगातील सर्व संधीचे सोने करता येवू शकते. शेती सोडून नका मात्र शेतीत अडकूनही पडू नका. आरक्षण हे निमित्त आहे. ते अंतिम साध्य नाही. अपमानातून निर्माण झालेली अस्मिता नवनिर्मितीसाठी वापरा. हातात दगड नव्हे, तर जबाबदारी उचलून समाजाला पुन्हा गतवैभव मिळवून द्या, अशा शब्दात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मराठा तरूणांना आवाहन केले. 

येथील नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मराठा समाजासमोरील प्रश्न आणि पुढील दिशा या विषयावर गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मंचावर नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आणि संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रोहित बागल यांची प्रमुख उपस्थिती होती. 

केवळ आरक्षणाने आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपल्या शेतीला, गावाला आणि घराला आलेली अवकळा पुसून टाकण्यासाठी ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंत उपलब्ध असलेल्या सगळ्या संधींचे रूपांतर रोजगारात करायला हवे. मराठा समाज बहुजनांपासून तोडण्याचे मोठे षडयंत्र रचले जात आहे. त्यामुळे सरकारकडून समाजातील तरूणांनी आता अपेक्षा करणे चुकीचे आहे. स्वतःचे छोटे-मोठे व्यवसाय सुरू करा. स्वतःच्या पायावर उभे रहा. स्वराज्याची निर्मिती शुन्यातून करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांचे जिवंत विचार आणि प्रेरणा आपल्याला पुन्हा एकदा अटकेपार झेंडे लावण्याची हिंमत दिल्याखेरीज राहणार नाहीत, अशा शब्दात गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

नवीन भूमिका आणि नवीन संकल्प घेवून लोकशाही मार्गाने संविधानाला अभिप्रेत असणारा मार्ग मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाने जगासमोर मांडला. तरीदेखील आरक्षण मिळू शकले नाही. क्रांतीमोर्चाप्रमाणे दुसर्‍या टप्प्यातील आंदोलनात नियोजनाचा अभाव होता. त्यामुळे यात मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी समाजकंटकांनी शिरकाव केला. दहा हजार गुन्हे दाखल झाले आहेत. 33 मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. हिंसेचा हा मार्ग लोकशाही आणि संविधानाला अपेक्षित नसल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. विद्यमान सरकारला रोजगार निर्माण करण्याला अपयश आले आहे. नोटाबंदीमुळे होते ते रोजगार मोडकळीस आले आहेत. मराठा समाजातील तरूणांनी डोक्यात शिवाजी आणि खिशात गांधीजी घेवून मार्गक्रमण करायला हवे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अमुल्य योगदान दिलेल्या आपल्या माणसांना ओळखा. त्यांना बदनाम करू नका. मराठ्यांना आणि त्यांच्या नेतृत्वाला एकटे पाडण्यासाठी सुरू असलेल्या कटाचे घटक होवू नका, असे सांगून गायकवाड यांनी सामाजिक न्यायाची कास न सोडण्याचे आवाहनही उपस्थितांना केले. 

प्रारंभी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बागल यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. सूत्रसंचालन रवींद्र केसकर यांनी तर आभार दौलत निपाणीकर यांनी मानले. कार्यक्रमास मराठा समाजबांधवांसह बहुजन समाजातील स्त्री-पुरूष, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
Top