उस्मानाबाद :- निसर्गाच्या प्रकोपामुळे केरळ राज्यात मागील शंभर वर्षात झाला नाही, असा प्रलय घडला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होवून चारशेहून अधिक जणांचा त्यात बळी गेला आहे. प्रचंड आर्थिक नुकसान आणि महापुरामुळे राज्यातील 14 पैकी अकरा जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्यातील आठही तालुक्यात गुरूवारी मदतफेरीचे आयोजन जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने करण्यात आले आहे.

व्यापारी महासंघाच्या भूम, परंडा, उमरगा, तुळजापूर, कळंब, वाशी, लोहारा या सर्व शाखांच्यावतीने गुरूवार, 23 ऑगस्ट रोजी मदतफेरी काढली जाणार आहे. महाप्रलयामुळे बेघर झालेल्या केरळ येथील नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून व्यापारी महासंघाने या मदतफेरीचे आयोजन केले आहे. प्रत्येक तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या मदतफेरीतून मिळालेली रक्कम केरळ येथील मदत कार्यासाठी पाठविण्यात येणार आहे. या मदतफेरीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होवून सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने करण्यात आले आहे.
 
Top