बार्शी (गणेश गोडसे) :
राळेरास ता.बार्शी येथील शेतरस्ता अडवणुकी संदर्भात बार्शी महसुल प्रशासनाचे दुर्लक्ष व रस्ता अडवून संबधीत शेतकऱ्यांकडून होणाऱ्या सततच्या त्रासाबद्दल वैराग पोलीसांकडून होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात दाद मागण्यासाठी राळेरास येथील पंके कुटुंबीयांच्या वतीने आज वैराग पोलीस ठाण्यासमोर उपोषण केले. करण्यात आलेल्या उपोषणात तीन लहान मुलासह दोन महिला व वृद्ध आई -वडिल अशा सात जणांनी सहभाग घेतला. भाऊसाहेब पंके, ज्योती पंके, प्रणव वय ११, प्रतिक पंके ९, प्रविण पंके वय ३, तानाजी पंके ( वय ६७ वर्ष) , पार्वती पंके,वय ६२ अशी उपोषण कर्त्यांची नावे आहेत.
राळेरास येथील पंके कुटुंबीयांची ८ एकर जमीन असुन त्या जमीणीत जाण्यासाठी पाणंद रस्ता आहे.मात्र लगतच्या शेतकऱ्याने तो अडविला आहे. शेतात द्राक्षबागेसह बागायती पिके आहेत. या शेतास जाण्यासाठी हा एकच रस्ता आहे.
सोलापूर जिल्ह्यात शेतीला पुरक पाणंद रस्त्याची गरज असल्याने जिल्ह्यात पाणंद रस्ते तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राळेरास ( ता. बार्शी ) हे गाव रोल मॉडेल म्हणून निवड केले. या वादग्रस्त बनलेल्या पाणंद रस्त्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, प्रातांधिकारी शिवाजी जगताप, बार्शीचे तहसिलदार ऋषीकेत शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. हे गाव जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दत्तक घेऊन शिव रस्ता, पाणंद रस्ते, पाऊल रस्ता, ओढा रस्ता करण्यासाठी शुभारंभ केला .मात्र हाच रस्ता वादात अडकला. या रस्त्यासाठी सात जणांनी महसुल व पोलीस प्रशासना कडून वारंवार होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात उपोषणाचा मार्ग स्विकारला होता.
या संदर्भात वैराग पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुहास जगताप, बीट अंमलदार गोडसे, पोलीस हवालदार अनिल लोकरे, वैरागचे मंडल अधिकारी सुनिल कालेकर,गाव कामगार तलाठी सतिश पाटील, राळेरासचे तलाठी एच.डी. ताले यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेतली व प्रत्यक्ष शेतात जाऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मार्ग काढण्यात येईल. असे लेखी अश्वासन वैराग मंडल अधिकारी यांनी दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले.
---------------