लोहारा (इकबाल मुल्ला) :
    मागील पंधरा दिवसापासून पावासाने उघडीप दिली आहे.लोहारा तालुक्यातील हलक्या प्रतीच्या जमिनीतील फुलोऱ्यात व फळधारणेत आलेली मूग, उडीद, सोयाबीन पिके पावसाअभावी माना टाकू लागले आहेत.परिणामी उत्पन्नात घट होण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
          मृग नक्षत्रात झालेल्या दमदार पावसानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी उरकून घेतली. पिकांची उगवण चांगली झाली असतानाच पावसाने तब्बल वीस दिवस दडी मारली. त्यामुळे  कोवळी पिके करपण्याच्या मार्गावर होती. परिणामी दुबार पेरणीचे  संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. ज्यांच्याकडे सिंचनांच्या सुविधा आहेत असे शेतकरी उपलब्ध पाण्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न करत होती. प्रदीर्घ विश्रांतीनंतर अखेर पावसाने तालुक्यात सर्वदूर हजरी लावली. पिकांना जिवदान मिळाल्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले. 11 ते 16 जुलैदरम्यान सलग सहा दिवस तालुक्यात भिज पाऊस झाला. या भिज पावसामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात ओल झाल्याने पिकांना उभारी मिळाली मात्र वाढ खुुंटली आहे.  पावसाच्या पुनार्गमनामुळे खरिपांच्या पिकांनी शेतीशिवार बहरल्याने उत्पन्नात मोठी वाढ होण्याची आशा शेतकऱ्यांना होती. त्यातच ढगाळ वातावरणामुळे पिकांवर पाणे कुरतडणाऱ्या आळ्यांचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात झाला. अशा वेळी शेतकऱ्यांनी महागामोलांची किटकनाशक औषधी घेऊन पिकांवर फवारणी केली. सलग पडलेल्या भिज पावसामुळे  पिके जोमाने बहरली आहेत. सोयाबीन, मूग, उडीद अडीच तीन महिन्यांचे नगदी पिके आहेत. पावनेदोन महिने झाल्याने सोयाबीन फुलोऱ्यात तर मूग, उडिदाला फळधारणा होत आहे. अशा वेळी पावसाची नितांत गरज असताना मात्र पंधरा दिवसापासून पावसाने गुंगारा दिला आहे. दिवसभर कडक ऊन पडत असून जमिनीतील ओल झपाट्याने कमी होत आहे. काळ्याभूईच्या ठिकाणची पिके तग धरून असले तरी हलक्या प्रतीच्या जमिनीतील पिके मात्र पावसाअभावी करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शितकरी हवालदिल झाला आहे.
 
Top