तुळजापूर :- तुळजापूर विधानसभा मतदार संघातील महावितरण च्या अडचणीबाबत 1 ऑगस्ट रोजी सर्किट हाऊस तुळजापूर येथे आ.मधुकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महावितरणचे मुख्य अभियंता श्री.कांबळे,अधिक्षक अभियंता श्री.पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, सभापती शिवाजी गायकवाड, कार्यकारी अभियंता पेंढारकर,राठोड, उपअभियंता शिवगण यांचेसह शाखा अभियंते उपस्थित होते.
यावेळी विविध गावातील शेतकरी उपस्थित होते.शेतकऱ्याकडून महावितरणच्या गहाळ कारभाराबाबत प्रश्नांचा भडीमार करण्यात आला,उपअभियंता व कार्यकारी अभियंत्याना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. डी.पी. 2-2 महिने न मिळणे, 2014 पूर्वी डिमांड भरुनही कनेक्शन मिळाले नाहीत. डी.पी. वर समसमान लोड नाही, सर्व सबस्टेशन ओव्हर लोड असून तीन शिप्टमध्ये वीजपुरवठा केला जात आहे.शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीजपुरवठा केला जात नाही.अनेक गावामध्ये लाईनमन नाहीत. किरकोळ साहित्यही मिळत नाही. चुकीची बिले दिली जातात, अधिकारी जागेवर राहत नाहीत.यामुळे शेतकरी हैराण झाला असल्याने आ.मधुकरराव चव्हाण यांनी अधिकाऱ्यांची खरडपटटी काढली. यापुढे यामध्ये सुधारणा झाली नाही. तर आपण स्वत: कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांसमवेत मोर्चा काढू होणाऱ्या परिणामास महावितरण जबाबदार असेल असे खउे बोलही आ.चव्हाण यांनी सुनावले.
दोन वर्षापूर्वी मंजूर झालेल्या बारुळ,तुळजापूर,नळदुर्ग येथील 33/11 केव्हीए सबस्टेशनची कामे अदयाप सुरु झालेली नाहीत. तसेच यापूर्वी मागणी केलेली देवकुरुळी ,नंदगाव,तामलवाडी,वडगाव काटी,सिंदगाव या ठिकाणची 33/11 केव्हीए सबस्टेशनला तातडीने मंजूरी दयावी.
तसेच केशेगाव,पाटोदा ता.उस्मानाबाद व फुलवाडी,माळुंब्रा, सलगरा दि., होर्टी, बोरगाव ता.तुळजापूर या 33/11 केव्हीए सबस्टेशनची क्षमतावाढ करण्यात यावी अशी मागणी आ.चव्हाण यांनी मुख्य अभियंत्याकडे केली. तसेच याबाबत सचिवासह मंत्री महोदयाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावर महावितरणचे मुख्य अभियंता श्री.कांबळे यांनी या सर्व प्रश्नावर परिणामकारकरीत्या कार्यवाही करण्यासाठी तीन आठवडयाचा कालावधीचा अवधी मागून घेतला असून स्थानिक पातळीवरचे प्रश्न मिटवण्यात येतील तसेच वरीष्ठ पातळीवरील विषय मंत्रालयीन पातळीवर निकाली काढण्यात येतील असेही अभिवचन देऊन अधिक्षक अभियंत्यासह कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांना कामे वेळेत करण्याबाबत , लोकप्रतिनिधीना विश्वासात घेऊन योजना राबवण्याबाबत कडक सुचना दिल्या तसेच 24 ते 25 ऑगस्टला याबाबतच्या संदर्भात पुन्हा बैठक घेण्यात येईल असेही सांगितले.बैठकीचे सुत्रसंचालन उपअभियंता शिवगण यांनी केले तर आभार कार्यकारी अभियंता पेंढारकर यांनी मानले.