सांगली : दिल्लीत काही समाजकंटकांनी संविधानाची प्रत जाळल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर शहरात सर्व राजकीय पक्ष आणि विविध संघटना एकटवल्या आहेत.येत्या १० सप्टेंबरला सांगली शहरात विविध सामाजिक संघटनांकडून संविधान सन्मान मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला आहे. हा निर्णय शनिवारी शहरात पार पाडण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला.
सांगलीमध्ये 'संविधान बचाव' यासाठी विविध सामजिक संघटना एकत्र आल्या आहेत. सांगलीच्या मराठा सेवा संघाच्या हॉलमध्ये आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी, आरपीआय यासह मराठा समाज आणि विविध सामाजिक आणि पुरोगामी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.
देशाच्या संविधानाचे खुलेआम दहन होणे हे शोकांतिका असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. यावर सर्व समाजाने लोकशाहीपद्धतीने उत्तर देणे गरजेचे असल्याची भूमिका मांडण्यात आली.या विचारातून येत्या १० सप्टेंबरला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर संविधान सन्मान मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला.तसेच या मोर्चाच्या तयारीसाठी प्रत्येक तालुक्यानिहाय बैठका आणि जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्याचबरोबर सर्व समाजाने यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन संविधान सन्मान मोर्चाचे आयोजकांनी केले आहे.
मोर्चाच्या पुर्वतयारी साठी 25 ऑगस्टला सांगलीतील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.