तुळजापूर (दास पाटील) :
झेडबीएनएफ तथा झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे प्रणेते कृषिऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर गुरुजी यांनी दि. १६ रोजी नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्याशी संवाद साधला. श्रीदुर्गा भक्त निवास सभागृहात तुळजापूरसह उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नगर जिल्हयातून नैसर्गिक शेती करणाया २१० शेतकऱ्यांना सुभाष पाळेकर गुरुजी यांनी सविस्तर मार्गदर्शन करुन पुढील वाटचालीची दिशा दाखविली.
शिबीराच्या प्रारंभी तुळजाभवानीमातेच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलाने करण्यात आले. पद्मश्री पाळेकर गुरुजी यांना शाल, फेटा व तुळजाभवानी देवीची प्रतिमा देऊन तुळशीदास फंड, दुर्गादास अमृतराव व श्री.दुर्गा नैसर्गिक शेती गटाचे अध्यक्ष आशिष फंड यांनी सत्कार केला.
सुभाष पाळेकर यांनी झिरो बजेट नैसर्गिक शेतीची संकल्पना, निती आयोगाचे राजीवकुमार तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्यासमोर मांडली होती. सध्या तेलंगणा, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्य शासनाने नैसर्गिक शेती संकल्पनेचा प्रसार करण्यासाठी त्यांची नियुक्ती केली आहे.
आजपर्यंत पाच लाखांहून अधिक शेतकरी नैसर्गिक पध्दतीने शेती करीत आहेत. चालू वर्षापासून कर्नाटक, छत्तीसगड, मेघालय या राज्यांनी झिरो बजेट नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले आहे.
पाळेकर गुरुजी यांनी नैसर्गिक शेतीची संकल्पना विषद करतांना, रासायनिक व सेंद्रीय शेतीचे दुष्परिणाम आपण भोगत असून, त्यापासून उत्पादीक धान्य, फळे व भाजीपाला विषयुक्त मिळतात. त्यामुळे विविध आजार पसरत आहेत. पाश्चात्य देशातील नागरीकांना विषमुक्त अन्नधान्य, फळे, भाजीपाला याचे महत्व माहित झाल्याने नैसर्गिक पध्दतीने उत्पादित मालास फार मोठी मागणी निर्माण झाली असल्याचे नमूद केले.
सध्याची शेती करण्याची पद्धत खर्चिक आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत आहे. त्याऐवजी झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या माध्यमातुनच कर्जमुक्त होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. झिरो बजेट शेतीत कांहीच विकत घ्यायचे नसल्याने शेती करतांना शेतकऱ्याला बँका/सावकारांच्या दारात भिक मागत उभे राहावे लागणार नाही. एका देशी गाईच्या माध्यमातून तीस एक्कर क्षेत्रावर झिेरो बजेट नैसर्गिक शेती करता येते. राळेगण सिध्दू, हिवरे बाजार पाणलोट क्षेत्रात आदर्श असले तरी आदर्श गांव नाहीत. शासनाचा सर्व निधी दोनच गांवात खर्च करुन आदर्श गांवे निर्माण होणार नाहीत. त्यासाठी गावातला पैसे गावातच व शहरातला पैसे सुध्दा गावातच आला पाहिजे, तरच खेडया-पाडयात समृध्दी नांदेल, असे प्रतिपादन केले.
झिरो बजेट नैसर्गिक शेतीसाठी सहा दिवसाचे निवासी शिबीर (२८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर) शिर्डी येथे साई शताब्दी सोहळयानिमीत्त शिर्डी संस्थान यांनी आयोजित केले आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांची मोफत भोजन व निवास व्यवस्था संस्थान मार्फत केली आहे. पूर्वनोंदणी करुन त्याचा लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या शंका समाधानानंतर शिबीराचा समारोप झाला.
कार्यक्रमात मागील दहा वर्षापासून नैसर्गिक पध्दती शेती करणारे तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा गांवचे शेतकरी शिवमुर्ती शिवाजी साठे यांचा नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी स्वरुपात शाल व श्रीफळ देवून पद्मश्री सुभाष पाळेकर गुरुजी यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत कांबळे यांनी केले, तर संपत जळके यांनी आभार मानले.