बार्शी (गणेश गोडसे) :-
    मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल व ते कायद्याच्या चौकटीत बसवायचे असेल तर मराठा जातीचा समावेश ओबीसी प्रवर्गामध्ये करूण ओबीसी प्रवर्गाचा कोटा वाढवण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी केली.ते बार्शी येथील शासकीय विश्रामगृहात मराठा समाजाच्या आरक्षण विषयक आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे पंढरपूर विभागाचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, सुहास कोलते,संभाजी ब्रिगेडचे बार्शी तालुकाध्यक्ष आनंद काशीद आदी उपस्थित होते. 
     यापूर्वी नचीपन कमिटीने ७५ % पर्यंत आरक्षण असावे अशी शिफारस केलेली होती. या कमिटीचे सदस्य आत्ताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद होते. नचीपन कमिटीच्या शिफारशी स्वीकारून कायद्यात ७५ टक्के पर्यंत आरक्षणाची तरतूद करून ओबीची मधील आरक्षणाची टक्केवारी वाढवून मराठा समाजाचा समावेश त्यात करावा. हा बदल करण्यासाठी केंद्रात भाजपचे बहुमत आहे तसेच राज्याच्या सहमतीसाठी भाजपच्या ताब्यात सर्वाधिक राज्य आहेत त्यांच्यासाठी हे करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी ही साधारनतः तीस वर्षा पूर्वी पासूनची आहे, समाजाने ५८ मोर्चे शांततेत काढले तरीही या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. ज्या योजना जाहीर केल्या त्याचीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे मराठा समाजातील युवकांमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आत्महत्या हा मार्ग नसून आपण लढवय्ये आहोत आरक्षणासाठी लढत राहू पण कोणी आत्महत्या करू नये असे आवाहनही खेडेकर यांनी यावेळी केले.गत २८ वर्षांपासून संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना म्हणून काम करत असून आम्ही आता राजकीय पक्ष म्हणूनही कार्य करत आहोत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक आम्ही पूर्ण ताकतीने लढवणार आहोत यासाठी सध्या मोर्चे बांधणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
 
Top